

BJP Wins BMC Election 2026 Reasons: मुंबई महापालिकेच्या निकालामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील 29 महापालिकांसाठी गुरुवारी मतदान झाल्यानंतर आज मतमोजणी पार पडली. बहुतांश ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी होताना दिसत आहेत, सर्वाधिक चर्चेत असलेल्या मुंबई महानगरपालिकेतही भाजपने सत्ता मिळवली आहे.
आतापर्यंत समोर आलेल्या आकड्यांनुसार मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या निकालात भाजप 100 जागांवर विजय मिळवत आघाडीवर आहे. शिंदे गटाची शिवसेना 30 जागांवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट 66 जागांवर, मनसे 8, काँग्रेस 12 तर इतर 11 जागांवर विजयी झाले आहेत.
मुंबई महानगरपालिकेवर तब्बल 25 वर्षांपासून असलेली ठाकरेंची सत्ता यावेळी हातातून गेली आहे. ठाकरेंशिवाय मुंबईचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र येऊन निवडणूक लढवत होते.
मराठी मतांचे एकत्रीकरण होईल आणि त्याचा थेट फायदा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि मनसेला होईल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्ष निकालात तसे घडताना दिसत नाही. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊनही सत्ता मिळवण्यात अपयशी ठरले आहेत. विशेषतः मुंबईसारख्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात हा पराभव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे.
दुसरीकडे, भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांनी विकास, पायाभूत सुविधा, स्थिर प्रशासन आणि केंद्र व राज्यातील सत्तेचा फायदा या मुद्द्यांवर प्रचार केला. त्याचा परिणाम मतदारांवर झाल्याचे दिसून येत आहे, शहरी मतदारांनी मोठ्या प्रमाणावर महायुतीला पाठिंबा दिला आहे. मुंबईतील मध्यमवर्गीय आणि नव्या मतदारांमध्ये भाजपला मिळालेला प्रतिसाद हा या विजयामागचा महत्त्वाचा घटक आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
ठाकरे गटाकडून मात्र निवडणूक प्रक्रियेवर आणि सत्ताधाऱ्यांच्या प्रचारावर टीका केली जात आहे. तरीही, एकूण राजकीय वास्तव पाहता मुंबई महापालिकेतील सत्ताबदल जवळपास निश्चित झाला आहे. राज्याच्या राजकारणात याचे दूरगामी परिणाम दिसून येतील.
मुंबईत महापालिकेची निवडणूक असली तरी मतदार अनेकदा नेता कोण आहे? हा विचार करुनच मतदान करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा गेल्या काही वर्षांत निर्णय घेणारा, प्रशासन चालवणारा, विकास करणारा आणि नियंत्रण ठेवणारा नेता, अशी तयार झाली आहे. प्रचारातही भाजपने स्थानिक उमेदवारांइतकाच फडणवीसांचा चेहरा पुढे केला. त्यामुळे शहरात स्थिर सरकार – स्थिर महापालिका असा मेसेज अधिक पोहोचला.
मुंबईकर घोषणा ऐकून नाही, अनुभवावरून मत देतात हे या निवडणुकीत दिसून आलं आहे. या निवडणुकीत भाजपने भावनिक मुद्द्यांपेक्षा विकास आणि सुविधा या मुद्द्यांवर भर दिला.
लोकांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित गोष्टी—
रस्ते, खड्डे
मेट्रो
वाहतूक कोंडी
पाणी, ड्रेनेज
साफसफाई
आरोग्य सुविधा
पावसाळ्यातील व्यवस्थापन
यावर भाजपने जास्त भर दिला. अनेक भागात मतदारांचा कल हा 'जो काम करेल त्यालाच मत' असा दिसला. मुंबईमध्ये लोकांना सुविधा महत्त्वाच्या वाटतात आणि भाजपने त्यावर नेमकं बोट ठेवलं.
मुंबई हे बहुभाषिक शहर आहे. मराठी मतदार महत्त्वाचा आहेच, पण तितकाच मोठा प्रभाव अमराठी मतदारांचाही आहे. उत्तर भारतीय, गुजराती, मारवाडी, दक्षिण भारतीय समुदाय शहराच्या अनेक वॉर्डांमध्ये निर्णायक ठरतो. भाजपने या पट्ट्यात संघटनात्मक काम केलं आहे.
स्थानिक संपर्क
लहान- मोठे कार्यक्रम
व्यापारी, नोकरदार वर्गाशी संवाद
सोसायटी लेव्हल नेटवर्किंग यावर काम केलं
या सगळ्यामुळे अमराठी वॉर्डांमध्ये भाजपची पकड जास्त मजबूत झाली. आणि मुंबई जिंकायची असेल तर या वॉर्डांमध्ये संपर्क ठेवणं गरजेचं आहे, भाजपने नेमकं हेच केलं.
भाजपचा विजय फक्त लीडरशिपमुळे झाला नाही, तर अनेक ठिकाणी योग्य उमेदवारांची निवड केली. मुंबईतील मतदार आता पार्टी कोणती? यासोबतच माणूस कोण आहे? हेही पाहतो.
भाजपने अनेक वॉर्डांमध्ये—
काम करणारे नगरसेवक
ओळखीचे चेहरे
स्थानिक प्रश्नांवर काम करणारे कार्यकर्ते
तरुण आणि महिला उमेदवार
तसेच दुसऱ्या पक्षांचे चांगले उमेदवार फोडले
जिथे उमेदवार मजबूत, तिथे पक्षाला फायदा झाला. शिवाय काही ठिकाणी विरोधकांनी कमकुवत उमेदवार दिल्याने भाजपचा मार्ग सोपा झाला.
भाजपची सर्वात मोठी ताकद म्हणजे यंत्रणा आणि नियोजन. मुंबईसारख्या शहरात निवडणूक जिंकायची असेल तर फक्त सभा घेऊन चालत नाही. बूथवरचा खेळ महत्त्वाचा असतो. मतदाराला मतदान केंद्रापर्यंत आणणं, त्याच्याशी वेळोवेळी संपर्क ठेवणं महत्त्वाचं असतं.
भाजपचं नियोजन कसं होतं?
बूथ स्तरावर कार्यकर्त्यांची टीम
मतदार सूचीवर काम
सोशल मीडिया आणि स्थानिक प्रचार
मतदारांपर्यंत थेट पोहोचणारी यंत्रणा
संपर्क ठेवून कामावर भर
यामुळे अनेक ठिकाणी भाजपला सिस्टिमचा फायदा झाला. विरोधकांकडे घोषणा होत्या, पण अनेक वॉर्डांमध्ये भाजपने ग्राउंडवर जाऊन काम केलं होतं.
मुंबई महापालिकेच्या निकालातून एक गोष्ट स्पष्ट होते. मतदार आता केवळ घोषणा ऐकत नाही, तर कोण काम करणार आणि कोण विकास करणार हे पाहून मतदान करतो. फडणवीसांची प्रतिमा, विकासाच्या मुद्द्यांवरचा फोकस, अमराठी भागातील पकड, उमेदवारांची अचूक निवड आणि निवडणूक यंत्रणेचं नियोजन, या पाच गोष्टी भाजपच्या विजयामागे निर्णायक ठरल्या.