

मुंबई : स्वप्नील कुलकर्णी
कैलासराणा शिवचंद्रमौळी, फणींद्र माथां मुकुटी झळाळी |
कारुण्यसिंधू भवदुःखहारी, तुजवीण शंभो मज कोण तारी ॥
अशा प्रकारे भक्ताच्या दुःखाचे क्षालन करणाऱ्या भगवान शंकराला आणि महाशिवरात्रीला हिंदुधर्मात महत्त्वाचे स्थान आहे. भगवान शंकराच्या सन्मानार्थ साजरी होणारी महाशिवरात्री केवळ एक धार्मिक उत्सव नसून, ती संयम आणि स्वतःच्या अंतरातील शिवतत्त्वाशी एकरूप होण्याची एक महापर्वणी आहे. या पवित्र रात्री केलेली मनोभावे प्रार्थना थेट महादेवापर्यंत पोहोचते, अशी अढळ श्रद्धा जनमानसात आहे. महाशिवरात्रीला मुंबापुरीमध्ये भक्तीच्या उत्साहाला उधाण येत असते. ‘हर हर महादेव’ या जयघोषाने अवघी मुंबापुरी दुमदुमून जाते. उद्या सर्वत्र साजऱ्या होणाऱ्या महाशिवरात्रीच्या पर्वानिमित्त मुंबई परिसरातील असलेल्या शिवमंदिरांचा घेतलेला आढावा.
बाबुलनाथ मंदिर हे मुंबईतील एक प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिर गिरगाव चौपाटीजवळ असलेल्या एका छोट्या टेकडीवर आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक या मंदिरात येतात. हे मंदिर मरीन ड्राइव्हच्या शेवटी आणि मलबार हिलच्या दक्षिणेस आहे, जे 1780 मध्ये बांधण्यात आले होते. तसेच 1900 मध्ये, भगवान शिवाच्या या शुभ, मूळ मंदिरात एक उंच शिखर जोडण्यात आले. या मंदिरात पोहोचण्यासाठी जवळचा रेल्वे मार्ग मरीन लाईन्स आहे.
मुंबईतील मलबार हिल्स येथे असलेले वाळकेश्वर मंदिर हे प्रसिद्ध हिंदू मंदिरांपैकी एक आहे. याठिकाणी, अनेक प्राचीन आणि स्वयंभू शिवमंदिर आहेत. असे मानले जाते की, त्रेतायुगात जेव्हा प्रभु श्रीराम 14 वर्षांच्या वनवासात होते, तेव्हा माता सीता यांना तहान लागली होती. तेव्हा प्रभु श्रीरामांनी येथे बाण मारले होते, ज्यामुळे याठिकाणी पाण्याचा स्त्रोत निर्माण झाला आणि याला बाणगंगा तलाव असे देखील ओळखले जाऊ लागले.
मुंबईतील अंबरनाथ येथे असलेले हे शिवमंदिर प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर अकराव्या शतकात बांधले गेले आहे. या मंदिराचे बांधकाम राजा छित्तराज यांच्या राजवटीत पूर्ण झाले आहे. हे मंदिर वालधुनी नदीच्या किनाऱ्यावर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे, हे मंदिर एका मोठ्या दगडावर कोरलेले आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी याठिकाणी मोठी यात्रा भरते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होतात. हे मंदिर अंबरनाथ रेल्वे स्टेशनपासून 2 किमी अंतरावर आहे.
वसईमधील वनराई आणि वन्यजीवांनी समृद्ध तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य क्षेत्रात समुद्रसपाटीपासून सुमारे 2100 फूट उंचीच्या तुंगार टेकडीवर तुंगारेश्वराचे प्राचीन मंदिर स्थित आहे. पौराणिक आख्यायिकेनुसार या मंदिराची स्थापना विमलासूर या शिवभक्ताने केली. निसर्गरम्य परिसरात वसलेल्या या मंदिराच्या परिसरात कालभैरव, खोडियार माता तसेच पार्वतीस्वरूप मानण्यात आलेल्या जागमाता या देवींचीही स्थाने आहेत.तुंगारेश्वर महादेव मंदिराला राज्य सरकारने 2001 साली ‘क’ वर्गीय पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.
ठाण्यातील टेंभी नाका परिसरात मसुंदा तलावाच्या काठावर वसलेले कौपिनेश्वर मंदिर हे सुमारे 1,100 वर्षांहून अधिक प्राचीन शिवमंदिर ग्रामदैवत मानले जाते. अंदाजे 1760 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. प्रवेशद्वारावर एक विशाल नंदी आहे. मुख्य मंदिरात भगवान शंकराच्या शिवलिंगासह ब्रह्मा, राम, हनुमान, शीतला देवी, उत्तरेश्वर, दत्तात्रेय आणि काली माता यांचीही मंदिरे आहेत.
दिवा स्थानक सोडल्यानंतर दिवा आणि कोपर स्थानकादराम्यान खाडीजवळ एक सुंदर मंदिर आपल्या सर्वांचे लक्ष वेधून घेते. हे मंदिर म्हणजे म्हातार्डेश्वर शिव मंदिर होय. या मंदिराची स्थापना 1982 साली झाली असून आतील शाळुंका हि स्वयंभू असल्याचे सांगण्यात येते. गर्भगृहाबाहेर नंदी, कासव तसेच होमकुंड आहे. नंदी आणि कासवाचे दर्शन घेऊन पुढे जाताच डाव्या आणि उजव्या बाजूस दोन मोठ्या शिळा आहेत. एक शिळा मूळ स्वरुपात असून दुसऱ्या शिळेस शेंदूर लावलेला आहे.