

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक गुरुवारी (१७ सप्टेंबर) जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी ते १६ मार्च या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत होणार आहे.
राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. बारावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा सोमवार, ८ फेब्रुवारी २०२७ पासून सुरू होणार असून, मंगळवार, १६ मार्चपर्यंत चालणार आहे. तर दहावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा सोमवार, १५ फेब्रुवारीपासून सुरू होऊन गुरुवार, ११ मार्च रोजी संपणार आहे. दोन्ही परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांसह शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आणि उजळणीचे नियोजन करता येणार आहे.
विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे, तसेच परीक्षेच्या काळात त्यांच्यावरील ताण कमी व्हावा, या दृष्टीने मंडळाने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक संबंधित विभागीय मंडळांच्या संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी अधिकृत वेळापत्रक तपासून त्यानुसार परीक्षेची तयारी करावी, असे आवाहन मंडळाने केले आहे.
लेखी परीक्षांपूर्वी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा बुधवार, २० जानेवारी ते शनिवार, ६ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत होणार आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा गुरुवार, २८ जानेवारी ते शनिवार, १३ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.