

मुंबई : उद्योगांना सोलर्स अवर्समध्ये सकाळी 9 ते सायं. 5 वेळेत वीज वापरल्यास 25 टक्क्यांपर्यंत सवलत मिळेल. महावितरणच्या उपाययोजनांमुळे पुढील पाच वर्षांत विजेचे दर दरवर्षी 1.2 टक्क्यांनी कमी होतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
आमदार चेतन तुपे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पूर्वी रात्री 12 ते 6 या वेळेत वीज वापरासाठी सवलत दिली जात असे. कारण, तेव्हा वीज शिल्लक असायची. आता सौरऊर्जेमुळे दिवसा (सकाळी 9 ते 5) विजेची उपलब्धता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे राज्य शासनाने धोरण बदलून दिवसा वीज वापरणाऱ्यांना 25 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा मोठा फायदा उद्योगांना होणार आहे.
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने वीज खरेदीच्या अंदाजात आणि भांडवली खर्चात काही तांत्रिक चुका केल्या होत्या. यामुळे महावितरणचे सुमारे 80,000 कोटी रुपयांचे एनर्जी चार्जेस आणि 55,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांचा खर्च नाकारला गेला असता. राज्य शासनाने या चुका आयोगाच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यामुळे कंपनीचे मोठे नुकसान टळले आणि ग्राहकांवरील संभाव्य दरवाढीचा भार कमी झाला.
राज्यात औद्योगिक वीज दरात कपात करण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्रात औद्योगिक विजेचा दर 8.32 रुपये प्रतियुनिट आहे. 2029-30 पर्यंत हा दर कमी होऊन 7.38 रुपये इतका होईल. तामिळनाडू (9.35 रुपये) आणि गुजरात (8.43 रुपये) या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा वीज दर स्पर्धात्मक आणि येत्या काळात देशात सर्वात स्वस्त असेल. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने सुरुवातीला कृषी ग्राहकांचे दर 30 टक्क्यांनी वाढवलेे, तर औद्योगिक दर कमी दाखवले होते. सरकारने या विसंगतीवर आक्षेप घेतल्यावर आयोगाने जुनी ऑर्डर मागे घेऊन ती सुधारली आहे. यामुळे शेतकऱ्यांवरील वाढीव वीज दराचा भार कमी झाला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.