

मुंबई : राज्यात सध्या 5,400 हून अधिक प्राध्यापकपदाच्या भरतीची प्रक्रिया सुरू असून, त्यापैकी मोठ्या संख्येने पदे भरण्यात येणार आहेत. याशिवाय, वित्त विभागाने 412 प्राध्यापकांच्या भरतीस मंजुरी दिली असून, जून महिन्यापर्यंत हे प्राध्यापक कार्यरत होतील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
समाजकार्य महाविद्यालयांच्या आकृतिबंधासंदर्भातील सुधारित प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे. या विभागांतर्गत असलेल्या अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापकांच्या 11,918 रिक्त पदांपैकी 5,012 पदांच्या भरतीला 11 फेब्रुवारी 2026 रोजी मान्यता देण्यात आली आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा अंतिम आकृतिबंध निश्चित झाल्यानंतरच उर्वरित पदभरतीबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार, विद्यार्थिसंख्येत काही प्रमाणात घट झाल्यामुळे रिक्त पदांची संख्या कमी झाली असली, तरी आवश्यक तेवढी भरती केली जाईल. त्यानंतर वर्षभराने पुन्हा आढावा घेण्यात येईल. तासिका तत्त्वावर नियुक्त प्राध्यापकांच्या मानधनातही वाढ करण्यात आली असून, ते 250 रुपयांवरून टप्प्याटप्प्याने 1,500 रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच, विविध व्यावसायिक क्षेत्रातील तज्ज्ञांनादेखील अध्यापनासाठी संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुमारे 2,900 पदांच्या भरतीसाठीही लवकरच मान्यता मिळविण्याचा प्रयत्न सुरू असून, त्यामुळे महाविद्यालयांमधील प्रशासकीय अडचणी दूर होतील, असे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.