

मुंबई : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील तब्बल 92 लाख महिलांना या योजनेसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या 2 कोटी 48 लाखांवरून थेट 1 कोटी 65 लाखांवर आली आहे.
योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर महिलांनी अर्ज केले होते. पात्रतेची पडताळणी सुरू झाल्यानंतर शासनाने उत्पन्न, शासकीय नोकरी, करदाते, दुहेरी लाभ आणि इतर निकषांच्या आधारे अनेक अर्जांची छाननी केली. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात महिलांचे अर्ज अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे.
माहिती अधिकारातून नवा खुलासा
माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागविण्यात आलेल्या माहितीतून हा आकडा समोर आला आहे. सध्या राज्यात 1.65 कोटी महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजेच सुरुवातीच्या लाभार्थी संख्येपेक्षा जवळपास 92 लाख महिलांची संख्या कमी झाली आहे.
बेकायदा लाभ घेणाऱ्यांकडून वसुली अद्याप नाही
योजनेत पात्र नसतानाही काही शासकीय कर्मचारी आणि अन्य अपात्र व्यक्तींनी लाभ घेतल्याचे यापूर्वी उघड झाले होते. मात्र, अशा लाभार्थ्यांकडून शासनाने दिलेल्या रकमेची अद्याप पूर्ण वसुली झालेली नसल्याची बाबही माहिती अधिकारातून समोर आली आहे. त्यामुळे अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई आणि वसुलीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पडताळणी मोहीम सुरूच
राज्य सरकारकडून लाभार्थ्यांची पडताळणी आणि माहितीची तपासणी प्रक्रिया सुरू असून, अपात्र लाभार्थ्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. योजनेतील पारदर्शकता राखण्यासाठी शासनाकडून सातत्याने छाननी केली जात असल्याचे सांगितले जात आहे.