

Ajit Pawar Bhagavad Gita ISCON: नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन (ISKCON) मंदिराचे अध्यक्ष डॉ. सूरदास यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठ्या चर्चेला उधाण आले आहे. श्रीमद्भगवद्गीता वाचल्याने व्यक्तीचा अपघाती मृत्यू होत नाही, असा खळबळजनक दावा डॉ. सूरदास यांनी केला आहे.
काय आहे नेमका दावा?
डॉ. सूरदास यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "भगवद्गीता हे केवळ एक पुस्तक नसून ते मानवी जीवनाला योग्य दिशा देणारे तत्त्वज्ञान आहे. जे लोक श्रीमद्भगवद्गीता पूर्णपणे समजून घेऊन आपल्या जीवनात उतरवतात, त्यांचा कधीही अपघाती किंवा अवेळी मृत्यू होत नाही."
त्यांनी पुढे माहिती दिली की, गेल्या वर्षीच्या आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर त्यांनी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना आपल्या हाताने श्रीमद्भगवद्गीता भेट दिली होती. "मी त्यांना ही भेट देताना हा पवित्र ग्रंथ आवर्जून वाचण्याची आग्रही विनंती केली होती. परंतु, मला खात्री आहे की त्यांनी हा ग्रंथ वाचला नसावा. जर त्यांनी तो ग्रंथ वाचला असता, तर ही दुर्दैवी घटना किंवा असा अपघाती मृत्यू झाला नसता," असे विधान डॉ. सूरदास यांनी केले आहे.
अजित पवारांसोबत घडलेली घटना अत्यंत दुःखद असल्याचे सांगत त्यांनी सर्वांनाच श्रीमद्भगवद्गीता नियमित वाचण्याचे आणि ती समजून घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, डॉ. सूरदास यांच्या या विधानावर आता निरनिराळ्या प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.