

Girish Mahajan Reaction: मुंबईतील भाजपच्या महिला आरक्षण दुरूस्ती विधेयकाबाबत काढलेल्या मोर्चावेळी एका महिलेने राग व्यक्त करत त्वरित ट्रॅफिक क्लिअर करण्याची मागणी केली होती. यावेळी त्या महिलेने भाजपचे मंत्री गिरीष महाजान यांच्यावर देखील आगपाखड केली होती. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता याबाबत गिरीष महाजन यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली असून इथून पुढे आम्ही काळजी घेऊ असं समंजसपणाचं वक्तव्य देखील केलं आहे.
गिरीष महाजन माध्यमांशी बोलताना म्हणाले की, 'आमचा मोर्चा जो निघाला होता तो महिलांसाठीच निघाला होता. महिलांच्या आरक्षणासंदर्भातीलच तो मोर्चा होता. मात्र त्या महिलेचा राग, संताप हा खूपच अनावर झाला होता. त्यामुळेच त्या बोलत होत्या. मात्र यापुढे आम्ही निश्चित काळजी घेऊ.'
महाजन पुढे म्हणाले, मोर्चा असला आंदोलन असले की असे प्रकार नेहमी घडत असतात. याची तुम्हाला देखील कल्पना आहे. आम्ही पुढच्या वेळी याबाबत काळजी घेऊ मात्र त्या महिला ज्या प्रकारे बोलल्या ती भाषा देखील संसदीय नव्हती. त्याचे म्हणणे होते त्यांचा राग होता ते त्यांनी वेगळ्या भाषेत मांडणं गरजेच आहे. पोलिसांकडे तक्रारही करू शकल्या असत्या. आम्ही पोलिसांची रीतसर परवानगी घेतली होती.'
गिरीष महाजन यांनी भाजपचे प्लॅनिंग चुकले का असा प्रश्न विचारल्यावर म्हणाले, 'काल (दि. २१ एप्रिल) लोकांना देखील थोडा त्रास झाला. आम्ही हे मान्य करतो मात्र प्रत्येक मोर्चात हे होत असतं. आमचा साडे पाच वाजता मोर्चा होता. मोर्चा काही रात्री निघू शकणार नाही. मोर्चाचा मार्ग ठरलेला होता. परवानगी मागितली होती. त्यामुळं आमचं नियोजन कुठंही चुकलेलं नाही. आमची भगिनी येऊन अशा प्रकारे बोलते, बाटली फेकून मारते हेही काही योग्य नाही. तो मोर्चा महिलांसाठीच होता.'