

मुंबई: मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाचे माजी अवर सचिव आर. व्ही. एस. मणी यांनी केलेले खुलासे अत्यंत धक्कादायक असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मांडली.
आर. व्ही. एस. मणी यांनी अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत, २६/११ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला म्हणजे तत्कालीन काँग्रेस सरकार आणि पाकिस्तानची गुप्तचर संघटना 'आयएसआय' यांच्यातील एक प्रकारे पूर्व-नियोजित कट होता, असे विधान केले होते.
तसेच, दहशतवादी अजमल कसाब जिवंत पकडला गेला. अन्यथा या संपूर्ण जिहादी हल्ल्याचे खापर हिंदू संघटनांवर फोडण्याचा पूर्ण प्रयत्न झाला असता, असे विधान मणी यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर मंत्रालयात माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, मणी यांनी केलेले दावे हादरवून सोडणारे आहेत.
या विषयातील काही संशयास्पद बाबी मी स्वतः तत्कालीन विधानसभेत उपस्थित केल्या होत्या. त्या काळात मुंबई हल्ल्याबाबत गुप्तचर यंत्रणांकडून इशारे आधी मिळाले होते, याचे पुरावे मी विधानसभेच्या पटलावर मांडले होते. हे प्रकरण देशाच्या सुरक्षेशी निगडित असल्याने या संदर्भात योग्य आणि सखोल चौकशी झाली पाहिजे, हीच माझी अपेक्षा आहे.
या प्रकरणाचा गैरवापर करून गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शहा यांना राजकीयदृष्ट्या लक्ष्य करण्याचा आणि त्यांना अडचणीत आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला होता, असेही मणी यांनी म्हटले आहे.