

Amol Mitkari Tweet: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांचे काही ट्विट सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. अमोल मिटकरी यांनी जय पवार यांना विधन परिषदेची उमेदवारी द्यावी अशी मागणी करत महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली. या मागणीचे पत्र त्यांनी थेट पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांना लिहिले. यानंतर त्यांनी मला जे विधानपरिषदेसाठी इच्छुक आहेत त्यांनी देखील माझ्या मताला पाठिंबा दिल्याचं दुसरं ट्विट केलं होतं.
मात्र या राजकीय टिवटिवाटात अमोल मिटकरी यांचे अजून एक ट्विट सध्या चर्चेत आलं आहे. त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून दादा गेल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय आणि सामजिक पार्श्वभूमीवर काय काय घडतंय हे सांगण्याचा प्रयत्न केला.
अमोल मिटकरी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 'आदरणीय दादा आपल्याला आज जाऊन तीन महिने पुर्ण होताहेत. याच वेळात महाराष्ट्र काळा दिवस अनुभवत होता. या तीन महिन्यात आपण गेल्यानंतर महाराष्ट्रात बऱ्याच गोष्टी घडल्या. भोंदू बाबांना पेव फुटले, ट्राफिकचे प्रश्न बिकट होत गेले, गोविंद पानसरे यांच्या सारख्या लेखकांना मरणोपरांत मारण्याची भाषा ऐकायला मिळाली, काही जैन मुनींचे प्रक्षोभक हिंसेला प्रोत्साहन देणारे विखारी विचार ऐकायला मिळाले, अमराठी उपऱ्यांचा मराठी माणसांवरचा राग बघायला मिळाला, अजुन महाराष्ट्र खूप काही बघणार आहे मात्र तुमच नसणं हे महाराष्ट्रासाठी आता अहिताचे आहे #Dada Maharashtra Miss u'
अमोल मिटकरी यांनी यापूर्वीच्या आपल्या ट्विटमध्ये अजित पवार यांचे सुपूत्र जय पवार यांना विधान परिषदेची उमेदवारी द्यावी अशी मागणी केली. याबाबतचे पत्र देखील त्यांनी सुनेत्रा पवार यांना लिहिले. यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक विधान परिषदेची जागा येते त्या जागेवर जय पवार यांची निवड उचित राहील असं मत व्यक्त केलं. त्यांनी महाराष्ट्रासाठी दादांनंतर हाच एक चेहरा (जय पवार) आश्वासक वाटतो. असं म्हणत मोठं राजकीय भाष्य केलं आहे. त्यांनी पक्षातील लॉबिंगबाबत देखील भाष्य केलं.
जय पावर यांनी देखील नुकतेच बारामतीतून २०२९ च्या निवडणुकीत मी उभं रहावं अशी कार्यकर्ते आणि लोकांची इच्छा असल्याचं सांगत आपल्या राजकीय सुप्त इच्छांना मतदानादिवशीच मोकळी वाट करून दिली होती. यानंतर शरद पवार गाटाच्या रोहित पवार यांनी २०२९ ला बारामतीत पवार विरूद्ध पवार असा सामना कदाचित होऊ शकतो असं वक्तव्य करून पुढच्या राजकीय खेळीचा अंदाज सर्वांना दिला होता. आता अमोल मिटकरी यांनी जय पवार यांनी विधान परिषदेवर जावे अशी मागणी करत चर्चेला वेगळं वळण दिलं.