

Agriculture Minister Datta Bharne on Artificial Rain
मुंबई, पुढारी वृत्तसेवा : गेल्या महिन्याभरात पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. राज्यातील काही भाग दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा ठाकला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या माध्यमातून मदत करण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी आज (दि. ८) 'पुढारी न्यूज'शी बोलताना दिली.
गेल्या काही दिवसांपासून र कृत्रिम पावसाची चर्चा सुरू आहे. यावर बोलताना कृषी मंत्री दत्ता भरणे म्हणाले, "कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी होऊ शकत नाही, तसेच सध्या तरी राज्य सरकारचा असा कोणताही विचार नाही."
या गंभीर पार्श्वभूमीवर राज्य सरकार परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या माध्यमातून मदत करण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे, असेही भरणे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या या बिकट परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी विरोधकांनाही एकत्र येण्याचे आवाहन केले. "शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून कुणीही राजकारण करू नये. या संकटाच्या काळात सत्ताधारी आणि विरोधकांनी सर्व मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी संयुक्त प्रयत्न करावेत," असे आवाहन त्यांनी केले. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून लवकरात लवकर दिलासा देण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.