Sangli Lok Sabha: सांगली ठाकरेंकडेच; विश्वजीत कदमांचे प्रयत्न निष्फळ, विशाल पाटील नॉट रिचेबल

Sangli Lok Sabha: सांगली ठाकरेंकडेच; विश्वजीत कदमांचे प्रयत्न निष्फळ, विशाल पाटील नॉट रिचेबल

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीसाठी सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू होती. काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी पूर्ण ताकद लावूनही त्यांना जागा मिळवता आली नाही. अखेर ठाकरे गटाचे उमेदवार चंद्राहार पाटील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे.  तर काँग्रेस उपाध्यक्ष विशाल पाटील नॉट रिचेबल झाले असून आता कोणती भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. Sangli Lok Sabha

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला मंगळवारी (दि.९) जाहीर करण्यात आला. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा संपुष्टात आल्याचे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचे नेते एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे जाहीर केले.  Sangli Lok Sabha    Maha Vikas Aghadi seat sharing

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला २१, काँग्रेसला १७ आणि शरद पवारांची राष्ट्रवादी १० जागा लढणार आहे. सांगलीची जागा अखेर ठाकरेंच्या शिवसेनेकडे राहणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले. यामुळे सांगलीची जागा काँग्रेस लढणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर उत्तर मुंबईची जागा काँग्रेसला देण्यात आली आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ ठाकरे गटाकडे गेला आहे. त्यामुळे येथून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले काँग्रेस उपाध्यक्ष विशाल पाटील आता कोणती भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तर सांगलीची जागा काँग्रेसकडेच कायम राहण्यासाठी माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी पूर्णपणे ताकद पणाला लावली होती. मुंबई, नागपूर, दिल्लीपर्यंत जाऊन त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली होती. अगदी त्यांनी टोकाची भूमिका घेण्यास तयार असल्याचे सांगितले होते. अखेर त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.

. Sangli Lok Sabha : विशाल पाटील अपक्ष लढण्याच्या तयारीत, पडद्यामागे नेमके काय घडले?

सांगली लोकसभेच्या जागेवरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातला वाद टोकाला गेला होता. दरम्यान, सांगली लोकसभा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेकडेच राहणार असल्याचे आज महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. शिवसेनेने हा मतदारसंघ काँग्रेसला सोडलेला नाही. यामुळे विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांची सांगलीतील उमेदवारी मागे घ्या, असा आग्रह काँग्रेसकडून धरण्यात आला. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले. पण ठाकरे सांगलीच्या जागेवर ठाम राहिले. यामुळे काँग्रेसला ही जागा सोडावी लागली.

सांगलीच्या जागेवरून आक्रमक भूमिका घेतल्यास त्याचा परिणाम केवळ राज्यातच नव्हे देशपातळीवरही होऊ शकतो, अशी भीती काँग्रेस श्रेष्ठींना आहे. मित्रपक्षांना सोबत घेऊन जाण्यात काँग्रेस कमी पडतेय, हे चित्र निर्माण होणे हे काँग्रेससाठी फायद्याचे नाही. त्यामुळेच मैत्रीपूर्ण लढतीसाठीही काँग्रेस श्रेष्ठी अनुकूल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठाकरे गटाने आपला उमेदवार निवडणूक मैदानात ठेवला, तरी आम्हाला मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी द्या, असा हट्ट विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी पक्षश्रेष्ठींकडे धरला होता; पण मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी दिली, तर इंडिया आघाडी एकसंधपणे निवडणुकीला सामोरे जाणार नाही, अशी भीती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना आहे. त्यामुळे सांगली आणि भिवंडीच्या जागेवर तोडगा काढण्यात आला आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news