अनिल देशमुखांप्रमाणेच मलाही कटकारस्थानात अडकवण्याचा प्रयत्न : नवाब मलिक

मुंबई : पुढारी ऑनलाईन
मुंबई ड्रग्ज प्रकरणातील अनेक बाबी माध्यमांसमोर आणल्यामुळे माझ्यावर मागील काही दिवस पाळत ठेवली जातीय. मला खोट्या गुन्ह्यांमध्ये अकडविण्यासाठी केंद्रीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुखांप्रमाणेच मलाही कटकारस्थानात अडकवण्याचा प्रयत्न सुरु आहे, यासंदर्भात केंद्रीय अधिकार्यांविरोधात माझ्याकडे सबळ पुरावे आहेत, असा गौप्यस्फोट मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
यावेळी मलिक म्हणाले, अनिल देशमुख यांना खोट्या प्रकरणात गोवण्यात आले. अशाच प्रकारे मला अडकविण्याचा डाव आहे. मुंबई ड्रग्ज प्रकरणी आम्ही आवाज उठवला. यानंतर माझी हेरगिरी सुरु झाली.मागील काही दिवस माझ्यावर पाळत ठेवली जातील. यासंदर्भात मुंबई पोलिस आयुक्तांकडे मी तक्रार देणार आहे. अनिल देशमुख यांच्याबरोबर जे झाले तेच माझ्याबाबत करण्याचा कट रचण्यात आला आहे. माझ्याविरोधात खोट्या तक्रारी दाखल करण्यासाठी धडपड सुरु आहे. यासंदर्भात माझ्याकडे असणारे सबळ पुरावेही मी मुंबई पाेलिस आयुक्तांना देणार आहे. माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र मी सर्व दवाब झुगारुन देत माझे काम सुरुच ठेवणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडेही तक्रार करणार
मला खोट्या प्रकरणात अडकविण्याचा कट केंद्रीय यंत्रणांनी रचला आहे. यासंदर्भातील मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडेही तक्रार करणार आहे, असेही मलिक या वेळी म्हणाले. अशा कटकारस्थांनाना मी घाबरत नाही. केंद्रीय मंत्री अमित शहा हे माझ्याविरोधात कटकारस्थान करणार्यांवर यंत्रणेवर काय कारवाई करणार, याकडे माझे लक्ष आहे.याप्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
केंद्रीय अधिकार्यांविरोधात माझ्याकडे सबळ पुरावे आहेत
मला खोट्या गुन्ह्या अडकविण्याचा प्रयत्न सुरु आहे. केंद्रीय अधिकार्यांविरोधात माझ्याकडे सबळ पुरावे आहेत. सर्व तांत्रीक पुरावे देणार. निश्चितच संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा विश्वासही त्यांनी केला.
नारायण राणे यांनी केवळ नवस करावेत
नारायण राणे यांनी मार्च महिन्यात महाराष्ट्रात भाजपचे सरकार येईल, असे विधान केले होते. यावर बोलताना मलिक म्हणाले की, नारायण राणे यांनी केवळ नवस करावेत. सरकार पाडण्यासाठी त्यांनी यापूर्वीही अनेक नवस केले आहेत. त्यांच्याकडे अनेक कोंबड्या जमा झाल्या आहेत. मात्र त्याचा काहीच उपयोग होणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
नारायण राणे हे सोयीप्रमाणे राजकारण करतात. ते शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेले. यानंतर भाजपमध्ये. त्यामुळे त्यांनी सांगितले म्हणून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडणार नाही.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, अशा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला.
हेही वाचलं का?
- पुणे : आळंदीकडे चाललेल्या पायी दिंडीत पिकअप घुसली; २५ ते ३० वारकरी जखमी
- हिंगोली : नोकरीच्या पहिल्या दिवशीच काळाचा घाला, अपघातात दोघे चुलत भाऊ जागीच ठार
- शेती कायदे गेले; पण शेतीचे काय?