पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठवाड्यासह विदर्भात अवकाळी पावसाचा पिकांना मोठा तडाखा बसला आहे. खरीपासह रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी नुसत्या घोषणा करण्यापेक्षा तातडीने मदत जाहीर केली पाहिजे, परंतु राज्याचे मुख्यमंत्री दुसऱ्या राज्यात जाऊन दुसऱ्या पक्षाचा प्रचार करत आहेत, त्यामुळे आता हे सरकार बदलण्याची वेळ आली आहे, अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
ते आज (दि. २८) पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी खासदार संजय राऊत उपस्थित होते.
ठाकरे पुढे म्हणाले की, इतर राज्यात रेवड्या उडविणारे भाजप नेते महाराष्ट्रात गप्प का आहेत ? असा सवाल करून भाजपने इतर राज्यात थापा मारणे थांबवावे. राज्याला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री दुसऱ्या राज्यात प्रचारात गुंग आहेत. इतर राज्यात प्रचार करणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राकडे कधी बघणार, स्वतचे घर सोडून प्रचाराला जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांची गरज काय ? असा सवाल ठाकरे यांनी यावेळी केला.
शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने केलेल्या घोषणा हवेत विरल्या आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री दुसऱ्या राज्यात जाऊन दुसऱ्या पक्षाचा प्रचार करत आहेत. राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार म्हणजे दुष्काळातील तेरावा महिना आहे. आमदार अपात्रतेबाबतचा निकाल लागल्यानंतर एक दोन महिन्यात हे सरकार जाईल, असा दावा करून आता सरकार बदलण्याची वेळ आली आहे, असे सांगून ठाकरे यांनी शिवसैनिकांनी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन नुकसानीचा आढावा घ्यावा,असे आवाहन ठाकरे यांनी यावेळी केले.
हेही वाचा