महाराष्ट्रातील खरे जनरल डायर कोण ?: जालना घटनेवर आदित्य ठाकरेंचा सवाल
पुढारी ऑनलाईन डेस्क : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्यांनी आज (दि.६) राजभवनात राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार विनायक राऊत, आमदार आदित्य ठाकरे आदी नेते उपस्थित होते. राजभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गट आक्रमक झाला.
आदित्य ठाकरे म्हणाले की, अंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलकांवर लाठीमार करणाऱ्यांवर कारवाई न करणं ही दुर्दैवी गोष्ट आहे. राज्य सरकारच्या आदेशावरून लाठीचार्ज होऊ शकत नाही. पोलीस स्वत:हून लाठीमार करत नाहीत. आदेशावरून लाठीमार पोलिसांनी केलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील खरे जनरल डायर कोण ? आहेत, असा सवाल त्यांनी यावेळी केला. जालण्यातील आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.
इंडिया आघाडी एकत्र आल्याने भाजप घाबरले आहे. भारत जोडोमुळे मोदी सरकार घाबरले आहे. काश्मीरी पंडीत भारतवासी आहेत. जालनातील मराठा आंदोलक भारतवासी आहेत. त्यांच्या समस्यावर चर्चा झाली पाहिजे, असे इंडिया नाव बदलण्याच्या मुद्दयांवर ठाकरे यांनी भाष्य केले.
अंबादास दानवे म्हणाले की, मराठा आंदोलकांवर लाठीमार झाल्याच्या घटनेला राज्य सरकार जबाबदार आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे.
हेही वाचा