

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईचा विकास हे सरकार करणार नाही. निवडणुका होवू दिल्या जात नाहीत. मुंबईची सगळी सुत्रे ही शेवटी ठरल्याप्रमाणे मोदी शहांच्या उद्योगपतींच्या, धनिकांच्या सरकारने दिल्लीकडे घेतली. आणि या सरकाराचा खरा चेहरा उघडकीस आला. शिवसेनेने हे होवू दिलं नसतं, बाळासाहेबांच्या शिवसेनेनं होवू दिलं नसतं. म्हणून शिवसेना फोडण्यात आली. एक अत्यंत गुळचट पद्धतीचा मुख्यमंत्री आणि सरकार सत्तेवर बसले आहे. त्यांनी मुंबईच्या बाबतीत त्यांना जे हव आहे ते करवून घेतलं. असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. (Sanjay Raut)
खासदार संजय राऊत बोलत असताना म्हणाले की, या मुख्यमंत्र्यांमध्ये आणि त्यांच्या सरकारमध्ये मराठी म्हणून थोडा जरी स्वाभिमान तरी शिल्लक असेल तर ते राजीनामा देतील आणि सरकारला जाब विचारतील. १०५ हुतात्मांच्या बलिदानातून ही मुंबई मिळालेली आहे. बाळासाहेब ठाकरेंनी ५५ वर्षापुर्वी शिवसेना स्थापन केली. ती फक्त मुंबई महाराष्ट्रात राहावी आणि येथिल माणसाला मुंबईत स्वाभिमानाने जगता यावं. त्यांना स्थान मिळावं म्हणून आणि त्याच स्वाभिमानावर मोदी शहांच्या सरकारने त्यावर बुलडोझर फिरवायला सुरु केलं आहे. हे गुळचट आणि बुळं सरकार महाराष्ट्राचा आणि मुंबईचा अपमान उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.
गॅस सिलिंडरच्या कपातीसंदर्भात बोलत असताना ते म्हणाले की, गेल्या १० वर्षात लूट केली. आणि पुढल्या ३-४ महिन्यांसाठी कपात करुन आमच्या तोंडावर एवढी कपात फेकत आहेत. आमच्याच लुटीतील पैसे आम्हाला देत आहेत. निवडणुका तोंडावर आल्या आहेत. लोकसभेच्या निवडणुका आल्या आहेत म्हणूनच सर्वसामान्यांना हा लुटीचा तुकडा २०० रुपयाच्या नावाखाली तोंडावर फेकलेला आहे. ही भिक आहे. म्हणूनच आम्ही जे इंडिया स्थापन केलं आहे. ही लूट थांबवण्यासाठीच केली आहे.
मुंबईत इंडिया आघाडीच्या तिसऱ्या बैठकी संदर्भात बोलत असताना म्हणाले की, "तयारी पूर्ण झाली आहे. ठाकरेंची शिवसेना इंडिया आघाडीची बैठकीची यजमान आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमच्यासोबत आहेत. आमचे प्रतिनिधी देशभरातून मुंबईत येण्यास सुरुवात झाली आहे. मी खात्रीने सांगतो देशात आणि महाराष्ट्रात भाजपचा २०२४ मध्ये पराभव होईल आणि इंडियाची तशी पावले पडत आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.
हेही वाचा