जितेंद्र आव्हाडांनी फडणवीस यांचे पाय धरले होते : हसन मुश्रीफ
बीड; पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘उत्तर’ सभेत बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, ठाण्यात एकदा आव्हाडांवर गुन्हा दाखल झाला असता तेव्हा ते गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या पाया पडले होते. एवढेच नव्हे तर निवडणूक न लढविण्याबाबतही बोलले होते. एक गुन्हा दाखल झाला म्हणून ते असे वागले होते. हा किस्सा मला जयंत पाटील यांनी सांगितला होता. त्यावेळी अजित पवार विरोधी पक्षनेते होते. जयंत पाटील आणि अजित पवारांना घेऊन आव्हाड अध्यक्षांच्या दालनात गेले होते.
कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या सभेत आव्हाड यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत जे भाषण केले त्यात त्यांनी आमची संभावना गद्दार अशी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे माझा राग अनावर झाला होता आणि मी कोल्हापूर पायताण प्रसिद्ध असल्याचे सांगितले, असेही मुश्रीफ म्हणाले.
शरद पवरांना भुजबळांचा तडजोडीचा प्रस्ताव
अजित पवार तुमचे नेते आहेत तर उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना मान्यता द्या आणि राष्ट्रवादीतील भांडणे सोडवून मोकळे व्हा, असे आवाहन करत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते व अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर रविवारी टीकेचा भडीमार केला. तुम्ही येवल्यात येऊन माफी मागितली. गोंदियापासून कोल्हापूरपर्यंत किती ठिकाणी तुम्ही माफी मागणार आहात, असा सवाल त्यांनी शरद पवार यांना केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘उत्तर’ सभेत मंत्री भुजबळ यांनी अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असल्याचा पुनरुच्चार केला. दरम्यान, राजकारणात प्रत्येकाचा काळ असतो. कुणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. नवीन फळी उभी करायची असते, अशा शब्दांत अजित पवार यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन करत समन्वयाची भूमिका मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे तसेच त्यांनी घेतलेल्या निर्णयांचे त्यांनी तोंड भरून कौतुक केले.
हेही वाचा :