कुणा दुसऱ्याची मालमत्ता जप्त करून अजित पवारांचे नाव गोवण्याचे कारस्थान : मलिक | पुढारी

कुणा दुसऱ्याची मालमत्ता जप्त करून अजित पवारांचे नाव गोवण्याचे कारस्थान : मलिक

मुंबई : पुढारी ऑनलाईन

महाविकास आघाडी सरकार आपली जबाबदारी पार पाडत असताना केंद्रसरकार सत्तेचा गैरवापर करुन राज्यसरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र या प्रयत्नाला राज्यसरकार किंवा त्यातील एकही व्यक्ती न घाबरता लढा देणार, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी पक्षाचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी संबधित मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र यात कोणतेही तथ्य नसल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. कोणतीही संपत्ती ही बेनामी नसते. त्याचा कुणीतरी मालक असतोच. त्यामुळे दुसऱ्या कुणाचीतरी संपत्तीवर टाच आणून त्याला अजितदादांचे नाव देणे योग्य नसल्याचे नवाब मलिक म्हणाले. भाजपच्या नेत्यांची त्यांच्या नोकरांच्या, केंद्रीय मंत्र्यांच्या किचन कूकच्या नावे संपत्ती असल्याचेही समोर येऊ शकते. पण अशा प्रकरणातून केवळ बदनामी केली जाते. भुजबळ यांच्याबाबतीतही असेच झाले होते. महाराष्ट्र सदनात घोटाळा झाल्याचा आरोप होत असताना कोर्टाने त्यावर सुनावणी केली आहे. त्यात भुजबळांना निर्दोषत्व बहाल केले गेले. केवळ घाबरवण्याचे आणि धमकावण्याचा खेळ सुरु आहे यातून आम्ही घाबरुन जाणार नाही, असा दावाही नवाब मलिक यांनी केला.

जो खेळ बंगालमध्ये सुरु होता, तोच खेळ आता महाराष्ट्रात केला जातोय. निवडणुकीच्या आधीही हा बदनामीचा खेळ सुरु होता. भाजपने नेत्यांवर दबाव टाकून पक्ष सोडण्यावर भाग पाडले. अनेक लोक भाजपमध्ये तेव्हा गेले, ते आता सांगतात की, आम्हाला आता शांत झोप लागते. यावरुनच संस्थांचा वापर करुन दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसते. मात्र राज्य सरकार किंवा यातील एकही नेता अशा कारवाईंना घाबरणार नाही. अन्याय होतो आहे त्यावर लढा देऊ, असेही नवाब मलिक यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केले.

Back to top button