पुढारी ऑनलाईन: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राहुल शेवाळे काय म्हणतात याला मी जास्त महत्व देत नाही. तर सुप्रीम कोर्ट आज काय म्हटले हे महत्त्वाचे आहे. यावरून हे सरकार बेकायदेशीर झाले असल्याचे देखील कोर्टाने मान्य केले आहे. शिंदे सरकारला दिलासा मिळाला आहे, हे मान्य आहे. परंतु हा दिलासा केवळ १५ दिवसांसाठी असल्याचे उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्टपणे सांगितले आहे की, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता, तर आम्ही उद्धव ठाकरे यांचीच पुनर्नियुक्ती केली असती. त्यामुळे न्यायालयाच्या या निर्णयाचा आदर ठेवत बेकायदेशीर सरकारने तत्काळ राजीनामा देऊन सत्तेतून बाहेर जावे, असे देखील अनिल परब यांनी म्हटले आहे.
न्यायालयाच्या निर्णयाची कॉपी आमच्याकडे आल्यानंतर आम्ही विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊ. यानंतर कोर्टाच्या निर्णयावर पुढचा निर्णय लवकरात लवकर घेण्यास अध्यक्षांना विनंती करू, असे देखील परब यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.