कॉपीचे प्रकार न थांबल्यास राज्याचे वाटोळे होईल; सरकारने कडक भूमिका घ्यावी : अजित पवार संतापले | पुढारी

कॉपीचे प्रकार न थांबल्यास राज्याचे वाटोळे होईल; सरकारने कडक भूमिका घ्यावी : अजित पवार संतापले

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी-मानुर (ता. पाथर्डी) येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थीना कॉपी पुरवणाऱ्या जमावाकडून लाठ्या-काठ्या घेऊन भरारी पथकावर दगडफेक करण्यात आली. परीक्षा केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही बाब अत्यंत गंभीर आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात असे कॉपीचे आणि पेपर फुटीचे प्रकार वारंवार घडत आहेत. हे प्रकार न थांबल्यास राज्‍याचे वाटोळे होईल. याबाबत सरकारने गांभीर्याने घेऊन कडक भूमिका घेण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

विरोधी पक्षनेते पवार म्हणाले की, बुधवारी (दि.१५) टाकळी-मानुरीत (ता. पाथर्डी) दहावीचा भूमिताचा पेपर सुरु होता. त्यावेळी परीक्षार्थीना कॉपी पुरवणाऱ्या जमावाने परीक्षा केंद्रात बळजबरीने प्रवेश केला. भरारी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना धमकावून कॉपी पुरवण्यास मुभा देण्याची मागणी केली. अधिकाऱ्यांनी याला नकार देताच जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. अधिकाऱ्यांवर दगडफेक केली. पाथर्डीतील या घटनेबरोबरच जालन्यात परीक्षेदरम्यान जिल्हा परीषद शाळा, सेवली या केंद्रावर पाल्यांना कॉपी करू द्या, अन्यथा तुम्हाला जीवे मारू, अशी धमकी केंद्र संचालक व पर्यवेक्षक यांना देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षेच्यावेळी सामुहिक कॉपी आणि पेपरफुटी सारखे प्रकार वारंवार घडत आहेत. असे प्रकार घडल्यास अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होणार आहे. राज्याची शैक्षणिक क्षेत्रात पिछेहाट होऊन राज्याचे वाटोळे होईल. या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेऊन या विरोधात कडक भूमिका घेण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button