

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या राजकारणात गँगवॉर सुरू असल्याचे आपल्याला वाटत असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे. यावेळी अशोक चव्हाणांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर नाराजी व्यक्त केली. असे राजकारण न केलेले बरे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. (Ashok Chavan)
आजच्या राजकीय स्थितीत महाराष्ट्रात काँग्रेसच असा एक राजकीय पक्ष आहे, जिथे टोकाची भूमिका घेतली जात नाही. या उलट इतर पक्षांशी समन्वय साधत, संवाद ठेवत समतोल साधला जात आहे. आमची व्यवस्थित काम करण्याची भूमिका लोकांनी पाहिली असून ते कौतुक करत असतात. काँग्रेसमध्ये काहीतरी वर्किंग कल्चर आहे आणि वैचारिक भूमिका लोकांना पटते. सध्या जे सुरू आहे ते घृणास्पद आहे. काँग्रेसनं कधीही याला खतपाणी घातलेले नाही किंवा या गँगवॉरमध्ये गेलेली नाही, अ चव्हाण यांनी सांगितले. राजकारणाचे गँगवॉर सुरू आहे असे तुम्हाला वाटत आहे का? अशी विचारणा केली असता ते म्हणाले, हो, निश्चितच वाटत आहे. सध्या देशात जी काही स्थिती आहे ते एक वॉर आहे आणि कंसात गँगवॉर लिहिण्यासारखीच स्थिती आहे. एकमेकांना वैचारिक भूमिकेतून विरोध करा हे अनेक दिवस मी सांगत आहे.
विरोधकांचे संबंध कसे हवेत यासाठी देशपातळीवर उदाहरण द्यायचे झाले तर एकेकाळी राजीव गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांचे उत्तम संबंध होते. पक्ष वेगळे असल्याने सभागृहात एकमेकांविरोधात भूमिका मांडल्या असतील पण यू ट्यूबवर वाजपेयी यांचा एक व्हिडीओ आहे, ज्यामध्ये त्यांनी मला किडनीचा आजार झाल्यानंतर उपचारासाठी मला अमेरिकेत जायचं होतं. पण आर्थिक स्थिती नव्हती. राजीव गांधी यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी स्वतः मला अमेरिकेत पाठवलं आणि सरकारने सगळा उपचाराचा खर्च केला, असं सांगितले आहे. राजीव गांधी यांच्या निधनानंतर वाजपेयी यांनी ही गोष्ट मला सांगितली होती, असे अशोक चव्हाण म्हणाले. या आधीही सभागृहात वैचारिक मतभेदातून आरोप-प्रत्यारोप होत होते. पण सभागृहाच्या बाहेर गेल्यानंतर वेगळे वातावरण असायचे. एकमेकांबद्दल आदर असायचा. आज सर्व संपले आहे, असे ते म्हणाले.आपण एकमेकांचे वैयक्तिक शत्रू असल्यासारखे वागत असून एकमेकांना संपवण्याची भाषा सुरू आहे. हे काही बरोबर नसून असे राजकारण न केलेले बरे अशी माझी वैयक्तिक भूमिका आहे.
हेही वाचा