काँग्रेसला बदनाम करण्याचा भाजपचा प्रयत्न : नाना पटोले
पुढारी ऑनलाईन डेस्क : नागपूर विधान परिषद निवडणुकीनंतर काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यातील मतभेद समोर आले आहेत. दरम्यान, या दोन नेत्यांमधील वाद मिटविण्यासाठी काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील मुंबईत दाखल झाले आहेत. दुसरीकडे नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली आहे. काँग्रेसला बदनाम करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असा आरोप करून काँग्रेसमध्ये कोणतेही वाद नाही, असे पटोले यांनी स्पष्ट केले. ते आज (दि. १०) माध्यमांशी बोलत होते.
पटोले म्हणाले की, विधान परिषदेतील पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपने सुरू केला आहे. विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार जिंकतील, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. पुण्यातील कसबा मतदारसंघातून रवींद्र धंगेकर आणि चिंचवड मतदारसंघातून नाना काटे निवडून येतील, असे पटोले यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असेही पटोले म्हणाले.
नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस पक्षात कोणताही वाद नाही. भारतीय जनता पक्षाचा सतत पराभव होत असल्याने ते काँग्रेसची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला आहे की नाही हे मला माहीत नाही. त्यामुळे त्यावर मी उत्तर कसे देऊ असे ते म्हणाले. रायपूरमध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान अधिवेशन होत आहे. या अधिवेशनानंतर काँग्रेसमध्ये बदल होतील. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनामध्ये माझ्यासंदर्भात अग्रलेख लिहून माझ्या शक्तीची जाणीव करुन दिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
हेही वाचा