मुंबई : एका आठवड्यात मेट्रोतून १० लाखांहून अधिक मुंबईकरांचा प्रवास | पुढारी

मुंबई : एका आठवड्यात मेट्रोतून १० लाखांहून अधिक मुंबईकरांचा प्रवास

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केल्यानंतर केवळ आठवड्याभरातच १० लाखांहून अधिक प्रवाशांनी मेट्रो मार्ग २अ आणि ७ ने प्रवास (Mumbai Metro)  केला. आता या दोन्ही मेट्रो मार्गिका पूर्णपणे कार्यान्वित झाल्या आहेत. मेट्रो मार्ग १ सोबत जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशात पहिले मेट्रो नेटवर्क तयार झाले आहे. या दोन्ही मेट्रो मार्गिका मेट्रो १ च्या माध्यमातून रेल्वे मार्गाशी सहज जोडले गेले आहेत. त्यामुळे लाखो मुंबईकरांचा प्रवास सुकर झाला आहे.

२ एप्रिल २०२२ रोजी पहिला टप्पा कार्यान्वित झाल्यापासून, मेट्रो २ अ आणि ७ ने आतापर्यंत सुमारे १ कोटींहून अधिक मुंबईकरांना अखंड सेवा देण्यात यश मिळवले आहे. आजपर्यंत जवळपास १ कोटी ३ हजार २७० इतक्या प्रवाशांनी प्रवास केला. मेट्रो मार्ग २अ आणि ७ वर एकूण २२ ट्रेन दररोज २४५ मेट्रो सेवा पुरवत (Mumbai Metro)  आहेत.

मुंबई – १ कार्ड हे प्रवासादरम्यान आवश्यक असलेल्या सर्व गरजांसाठी एक सामान्य मोबिलिटी कार्ड आहे. मुंबई-१ कार्ड प्रवाशांना अखंडपणे प्रवास करण्यास मदत करत असल्याने हे कार्ड प्रवाशांसाठी अधिक सोयीचे होत आहे. हे कार्ड भारतातील सर्व महानगरांमध्ये आणि मुंबईतील सर्व सार्वजनिक वाहतूक सेवेसाठी वापरले जाऊ शकते. या कार्डचा वापर करून शॉपिंगसोबत तसेच मेट्रो, बेस्ट बसची तिकिटे खरेदी करू शकतात. मेट्रोच्या तिकीट खिडक्यांवर हे कार्ड उपलब्ध आहे. मुंबई -१ कार्ड प्रत्येक सहलीवर ५-१० टक्के सूट देते. सोमवार ते शनिवार – ५ टक्के, रविवार – १० टक्के आणि राष्ट्रीय सुट्ट्यादिवशी १० टक्के सूट मिळते.

Mumbai Metro  :  ७५ हजारांहून अधिक लोकांनी केले मेट्रो १ ॲप डाउनलोड

मुंबई १ कार्डप्रमाणेच ७५७३९ वापरकर्त्यांनी (६१७४२ Android आणि १३९९७ IOS) मुंबई-१ मोबाइल  ॲप्लिकेशन त्यांच्या डिव्हाइसवर डाउनलोड केले. या  ॲप्लिकेशनद्वारे प्रवासी त्यांच्या ठराविक अंतराच्या तिकिटांसाठी QR कोड तयार करू शकतात.

मुंबई १ कार्ड आणि ॲप हे मुंबईकरांच्या अखंड प्रवासासाठी एक प्रगत पाऊल आहे. आता मेट्रो हे केवळ वाहतुकीचे साधन राहिले नसून ती एक नवी जीवनवहिनी बनत आहे. पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण सोहळ्यानंतर आठवडाभरात १ दशलक्षाहून अधिक मुंबईकरांनी मेट्रोने प्रवास केला. लोक वाहतुकीसाठी खासगी वाहनांकडून पर्यावरणपूरक मेट्रोकडे वळत आहेत, असे महानगर आयुक्त एस. व्ही.आर. श्रीनिवास यांनी सांगितले.

 

हेही वाचा :  

Back to top button