शिवसेना कोणाची हा प्रश्न महाराष्ट्रात उपस्थित होत नाही : संजय राऊत
पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना कोणाची हा तांत्रिक मुद्दा निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतो. पण निवडणूक आयोगाने जे मागील निर्णय दिले, त्यावरून काय होत आहे हे कळलं आहे. शिवसेना कोणाची हा प्रश्न महाराष्ट्रात तरी उपस्थित होऊ शकत नाही. शिवसेना फक्त बाळासाहेब ठाकरेंची आहे, जी सध्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आहे, असा दावा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला. मुंबई येथे आज (दि.१७) माध्यमांशी ते बोलत होते.
ते म्हणाले, महाराष्ट्रातील अडीच लाख कोटींची गुंतवणूक डोळ्यासमोरून निघून गेली. ती परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले नाहीत. आता १ लाख ३६ हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार असेल तर स्वागतच आहे. पण दावोसमध्ये कितीही गुंतवणूक झाली असली तरी राज्यात गुंतवणुकीची जेव्हा पायाभरणी होईल तेव्हाच विश्वास ठेवू, असे ते म्हणाले. दरम्यान, राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेत काश्मीरमध्ये सहभागी होणार असून काश्मीर पंडितांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.