Chhagan Bhujbal : भुजबळांनी मुंबईला कोंबडीची उपमा दिल्याने प्रचंड गदारोळ

Chhagan Bhujbal : भुजबळांनी मुंबईला कोंबडीची उपमा दिल्याने प्रचंड गदारोळ

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री, आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेत 'सोन्याचे अंडे खा; पण कोंबडी कापून खाऊ नका.' या वाक्प्रचाराचा वापर मुंबईबाबत केला. त्यावरून विधानसभेत गदारोळ झाला. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी त्यावर आक्षेप घेत कामकाज दोनवेळा बंद पाडले. शेवटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली.

Chhagan Bhujbal : तुमच्यापेक्षा मला मुंबईचा जास्त अभिमान

पुरवणी मागण्यांवर बोलताना भुजबळ यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर भाजपच्या आमदार मनीषा चौधरी यांनी आक्षेप घेतला. भुजबळ यांनी मुंबईला कोंबडी म्हणून मुंबईचा अपमान केला. त्यामुळे त्यांनी आता माफी मागावी, अशी मागणी केली. ते जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना बोलू देऊ नका, अशी मागणी भाजप आमदारांनी करत गदारोळ केला. त्यावर संतप्त झालेल्या भुजबळ यांनी तुमच्यापेक्षा मला मुंबईचा जास्त अभिमान आहे, मी दोनवेळा मुंबईचा महापौर होतो. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, आंबेडकरांचा अवमान झाला तेव्हा तुम्ही कुठे होतात, असा प्रश्न विरोधकांना विचारला. मी केवळ वाक्प्रचार वापरला; पण तुम्हाला तो कळाला नाही. त्यातून तुमचे ज्ञान समजले, असा टोलाही भुजबळ यांनी लगावला. मात्र, भाजपचे आमदार शांत होत नव्हते. त्यामुळे जास्तच संतप्त झालेल्या भुजबळांनी मनीषा चौधरी यांना एकेरीवर बोलत खाली बसण्यास सांगितले. त्यामुळे भाजपचे आमदार आणखी आक्रमक झाले. भुजबळ यांनी महिला आमदारांचा अपमान केला आहे. त्यांनी महिलांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी योगेश सागर यांनी केली. यावरून सत्ताधारी आमदार आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली.

आमची महिलांचा सन्मान करण्याची भूमिका आहे, आम्ही महिलांना ३३ टक्के आरक्षण दिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्हीच ५० टक्के आरक्षण दिले आहे, असे सांगत काही लोकांच्या भावना दुखावल्या असतील; तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे सांगितले. मात्र, त्यानंतरही भुजबळांनी आक्रमक पवित्रा घेत, सावित्रीबाई फुले यांचा राज्यपालांनी अवमान केला तेव्हा कुठे होतात, असा सवाल केला. सत्ताधारी मंत्री छत्रपती शिवाजी महाराज, फुले- आंबेडकरांचा अवमान करतात, असा हल्लाबोल जयंत पाटील यांनी चढविला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news