अंधेरी पूर्व पोटनिवडणूक बिनविरोध करावी; राज ठाकरे, शरद पवार यांच्यानंतर प्रताप सरनाईकांची मागणी | पुढारी

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक बिनविरोध करावी; राज ठाकरे, शरद पवार यांच्यानंतर प्रताप सरनाईकांची मागणी

मुंबई : पुढारी ऑनलाईन ; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर आता बाळसाहेबांची शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही अंधेरी पूर्व पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. राज्याचे प्रमुख या नात्याने आपण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. जेणेकरून आपल्या महाराष्ट्रच्या राजकीय संस्कृतीचे जतन तर होईलच, पण त्याचसोबत रमेश लटकेंना देखील एक वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली ठरेल, असे पत्र सरनाईक यांनी मुख्यमंत्र्याना पाठविले आहे.

शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवल्यानंतर होणार्‍या पहिल्याच विधानसभा पोटनिवडणुकीला कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला आपला उमेदवार मागे घेण्याचे आवाहन पत्र लिहून केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पत्रकार परिषद घेत एखाद्या आमदाराच्या निधनाने रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीत सहानुभूतीने विचार करून सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक टाळावी, अशी भावना व्यक्त केली. तसेच ॠतुजा लटके यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा जाहीर केला. आज माघारीचा शेवटचा दिवस असतानाच आमदार प्रताप सरनाईक यांनीही मुख्यमंत्र्यांना निवडणूक बिनविरोध करण्याबाबतचे पत्र पाठविले आहे.

सरनाईक यांनी पत्रात म्हटले आहे की, रमेश लटके हे माझे अत्यंत जवळचे मित्र होते. विधानसभेत काम करत असताना मी, सुनील राऊत आणि रमेश लटके अनेक महत्वाच्या विषयांवर एकत्रित बसून सल्ला मसल्लत करायचो. रमेश लटके नेहमी त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी विधानसभेत आवाज उठवायचे, लोकांच्या प्रति काम करण्याची त्यांची तळमळ मी जवळून पाहिली आहे. शाखाप्रमुख पासून नगरसेवक आणि आमदार असा अत्यंत खडतर प्रवास त्यांनी केला होता.

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक
अंधेरी पूर्व पोटनिवडणूक

महाराष्ट्राची एक विशेष अशी अलिखित राजकीय संस्कृती आहे. जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी दुर्दैवाने मृत्युमुखी पडतो, तेव्हा आपण त्यांच्या कुटुंबियांना बिनविरोध निवडून देण्याचा एक पायंडा आहे. हि निवडणूक बिनविरोध होण्याच्या दृष्टीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील पत्राद्वारे त्यांचे मत मांडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सह अनेक पक्षांनी हीच भूमिका घेतली आहे. आपल्या युतीत ही जागा भारतीय जनता पक्षाला गेली आहे, परंतु राज्याचे प्रमुख या नात्याने आपण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून हि निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. जेणे करून आपल्या महाराष्ट्रच्या राजकीय संस्कृतीचे जतन तर होईलच, पण त्याच सोबत कै. रमेश लटकेंना देखील एक वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली ठरेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

Back to top button