

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील वाढती महागाई आणि पेट्रोल-डीझेलच्या किंमतींमध्ये असणाऱ्या दरवाढीचा परिणाम सार्वजनिक घटकांवर झालेला पहायला मिळत आहे. मुंबईमध्ये आता टॅक्सी आणि रिक्षाने प्रवास करणाऱ्या लोकांचा प्रवास महागणार आहे. मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन ट्रांसपोर्ट अॅथॉरिटीने (MMRTA) मंगळवारी (दि. २७ सप्टें) या दरवाढीची घोषणा केली आहे. १ ऑक्टोबर पासून ही दरवाढ होणार असल्याचे प्रसिद्धीपत्रक जाहीर करणार असल्याचे देखील एमएमआरटीए कडून सांगितले जात आहे. (Increase Fare Rate Mumbai)
एमएमआरटीएच्या आदेशानूसार पुढील महिन्यापासून टॅक्सीच्या दरात ३ रूपये आणि रिक्षा दरात २ रूपये वाढ केली आहे. याचा परिणाम मुंबई शहरातील नागरिकांच्या काळ्या-पिवळ्या टॅक्सीमध्ये प्रवास करण्यासाठी आता कमीतकमी २८ रूपये मोजावे लागणार आहे. रिक्षातून प्रवास करणारांकरिता २३ रूपये मोजावे लागणार आहेत. याआधीच्या दराबाबत बोलायचे झाले तर, टॅक्सीला १.५ किमीसाठी २५ रूपये आणि रिक्षाला १.५ किमीसाठी २१ रूपये इतका मोबदला प्रवासासाठी द्यावा लागत होता. महाराष्ट्र परिवहन सचिव विभाग आणि एमएमआरटीएच्या बैठकीमध्ये हा दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईमध्ये जवळपास ६०,००० टॅक्सी आणि ४.६ लाख अॅटो-रिक्षा आहेत. एमएमआरटीएने नव्या पेट्रोल आणि सीएनजी दरवाढीमुळे हा निर्णय लागू करण्यात आला आहे. या दरवाढीने आता सामान्य जनतेचा प्रवास महागणार आहे. या दरवाढीनंतर टॅक्सी आणि रिक्षा चालकांच्या संघटनांनी अपेक्षित दरवाढ झाली नाही असे मत व्यक्त केले आहे.
हेही वाचा