

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :
'मी पुन्हा येईन' हा निर्धार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खरा करून दाखविला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेना बंडखोर आमदार गटाचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते सरकार स्थापन करणार आहेत. आता नवीन मंत्रीमंडळात कोणाला स्थान मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतचे आमदार गोव्याहून आल्यानंतर हा दावा फडणवीस करतील. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, तर एकनाथ शिंदे यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाची धुरा येईल. भाजपचे 28 कॅबिनेट मंत्री, बंडखोर गटाचे ८ कॅबिनेट मंत्री आणि भाजप व बंडखोरांचे प्रत्येकी ५ राज्यमंत्री अशा ४६ जणांचे मंत्रिमंडळ सत्तेवर येण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ यादीला भाजप पक्षश्रेष्ठींची अंतिम मंजुरी मिळताच मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल.
भाजपमधून चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, संजय कुटे, रवींद्र चव्हाण, बबनराव लोणीकर आदींना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रकाश आवाडे, विनय कोरे यांच्या नावांचाही विचार होऊ शकतो.
बंडखोर गटातून एकनाथ शिंदे यांच्यासह उदय सामंत, भरत गोगावले, गुलाबराव पाटील, दीपक केसरकर, दादा भुसे, अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, संजय राठोड, शंभुराज देसाई, तानाजी सावंत आदी नावांचा मंत्रिमंडळात समावेशासाठी विचार होण्याची शक्यता आहे.
भाजपला आता अडीच वर्षे सरकार चालविण्याची संधी मिळणार आहे; पण हे अडीच वर्षांचे सरकार पुढील 25 वर्षे चालेल आणि राज्याचा विकास करेल, असा ठाम विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. त्याचवेळी त्यांनी एकनाथ शिंदे गटातील आमदारांचे विशेष आभार मानले.
हेही वाचा :