Rajya Sabha Election : कोल्हापूरचा तिसरा खासदार कोण होणार हे ठरलं! शिवसेनेच्या संजय पवार यांना विजयाची संधी | पुढारी

Rajya Sabha Election : कोल्हापूरचा तिसरा खासदार कोण होणार हे ठरलं! शिवसेनेच्या संजय पवार यांना विजयाची संधी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

Rajya Sabha Election : राज्यसभेसाठी आज शुक्रवारी २८५ आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना मात्र न्यायालयाने परवानगी नाकारल्याने मतदान करता आले नाही. मात्र, झालेले मतदान पहाता शिवसेनेच्या संजय पवार यांना विजयाची संधी आहे.

विधानसभेचे २८८ आमदार आहेत. त्यापैकी शिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने २८७ आमदारांचे मतदान अपेक्षित होते. मात्र, ईडीच्या अटकेत असलेले अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना उच्च न्यायालयानेही परवानगी न दिल्याने त्यांना मतदान करता आले नाही. पण निवडणुकीतील चुरस पाहता भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना पुण्याहून रुग्णवाहिकेतून मतदानाला आणण्यात आले.

राज्यसभेसाठी (Rajya Sabha Election) महाराष्ट्रातून झालेले मतदान पहाता महाविकास आघाडीला चारही जागा जिंकण्याची संधी आहे. एमआयएमने ऐनवेळी काँग्रेसला पाठिंबा दिला. शिवाय सपा, बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष, माकप आणि आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांनी अपेक्षेप्रमाणे मतदान केल्याने शिवसेनेच्या संजय पवार यांना विजयाची संधी आहे.

काँग्रेसने आपल्या कोट्यातील दोन तर राष्ट्रवादीनेही शिवसेनेला अतिरीक्त ८ ते ९ मते दिली आहेत. त्यामुळे संजय पवार यांचे पारडे जड आहे. हितेंद्र ठाकूर यांनी अखेरपर्यंत आपली भूमिका जाहीर केली नाही. त्यामुळे त्यांची मते कोणाला मिळाली याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.

सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी आज शुक्रवारी मतदान झाले. सकाळी ९ वाजता मतदानाला सुरुवात झाली. मतदानाची वेळ ४ पर्यंत होती. पण त्यापूर्वीच बहुतांश आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राज्यसभेसाठी एकूण २८५ आमदारांनी मतदान केले. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना न्यायालयाने परवानगी नाकारल्याने त्यांना राज्यसभेसाठी मतदान करता आले नाही. एमआयएमने महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केले. तर काँग्रेसने आपल्या उमेदवाराला ४२ मते दिली. तर काँग्रेसने आपली दोन मते शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना दिली. यामुळे संजय पवार यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.

महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. तसेच आमचा विजय निश्चित असल्याचे भाजपच्या नेत्यांनी म्हटले आहे. दरम्यान, सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी आघाडी आणि भाजपकडे पुरेशी मते नव्हती. त्यामुळे दोघांची मदार छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांवर होती. या निवडणुकीत अपक्षांची मते निर्णायक ठरणार असल्याने त्यांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ दिसून आली.

हे ही वाचा :

Back to top button