बाजार कोसळला, पण मुकेश अंबानींच्या ‘रिलायन्स’चा मोठा पराक्रम! बाजार भांडवल १९ लाख कोटींवर | पुढारी

बाजार कोसळला, पण मुकेश अंबानींच्या 'रिलायन्स'चा मोठा पराक्रम! बाजार भांडवल १९ लाख कोटींवर

मुंबई; पुढारी ऑनलाईन

मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजचं ( Reliance Industries) मार्केट कॅपिटलायझेशन (Market capitalization) अर्थात बाजार भांडवल १९ लाख कोटींवर पोहोचले आहे. हा ऐतिहासिक टप्पा पार करणारी रिलायन्स पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. बुधवारी शेअर बाजारात घसरण दिसून आली. पण बुधवारच्या सुरुवातीच्या व्यवहारात Reliance Industries च्या बीएसईवरील शेअरने १ टक्क्यांहून अधिक उसळी घेतली. यामुळे शेअरची किंमत उच्चांकी २८२७.१० रुपयांवर पोहोचली. यामुळे कंपनीचे बाजार भांडवल १९,१२, ८१४ कोटी रुपयांवर पोहोचले.

या वर्षी मार्च महिन्यात कंपनीचे बाजार भांडवल १८ लाख कोटींवर गेले होते. गेल्या वर्षी १३ ऑक्टोबर रोजी कंपनीचे मार्केट कॅपिटलायझेशनने १७ लाख कोटींचा टप्पा पार केला होता. आता कंपनीने १९ लाख कोटींचा उच्चांकी टप्पा पार केला आहे.

दरम्यान, अब्जाधीश असलेल्या मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने संयुक्त अरब आमिरातमध्ये (UAE) २ अब्ज डॉलरच्या TA’ZIZ रासायनिक संयुक्त उद्योगासाठी औपचारिक भागधारक करारावर स्वाक्षरी केली आहे. तसेच पारंपारिक आणि अपारंपरिक संसाधने शोधण्यात आणि तयार करण्यासाठी ADNOC सोबत सहकार्य करण्याचा करार केला आहे. यामुळे रिलायन्सच्या शेअर्समध्ये चालू वर्षात १९ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजने ३१ डिसेंबर रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा चांगल्या आर्थिक उलाढालीचे आकडे जाहीर केले होते. कंपनीने एकत्रित निव्वळ नफ्यात ४१.५८ टक्के वाढ नोंदवली होती. यामुळे कंपनीचा एकत्रित महसूल १८,५४९ कोटी रुपयांवर पोहोचला होता. याआधीच्या वर्षी याच कालावधीत कंपनीने १३,१०१ कोटी रुपयांचा नफा कमावला होता.

 हे ही वाचा :

 

Back to top button