उदय सामंत : ‘भारतीय संविधानाची ओळख’ विषय सर्व विद्यापीठात सर्व विद्याशाखांसाठी अनिवार्य | पुढारी

उदय सामंत : 'भारतीय संविधानाची ओळख' विषय सर्व विद्यापीठात सर्व विद्याशाखांसाठी अनिवार्य

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राज्यभरात आज ( दि.१४ ) उत्साहात साजरी करण्यात येत आहे. दरम्यान, त्यांच्या कार्याची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘भारतीय संविधानाची ओळख’ हा विषय सर्व विद्यापीठातील सर्व विद्याशाखांसाठी अनिवार्य करण्यात येणार आहे. याबाबतच निर्णय सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सर्वसहमतीने घेण्यात आला, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विट करून दिली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य आणि त्यांचे संविधान निर्मितीमधील योगदान महत्तवपूर्ण आहे. त्यांच्या या कार्याची माहिती पुढील पिढीला होणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ‘भारतीय संविधानाची ओळख’ हा विषय सर्व विद्यापीठांतील सर्व विद्याशाखांसाठी अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भावी पिढीला संविधानातील मूल्यांची ओळख होण्यास मदत होणार आहे.

त्याचबरोबर प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येक नागरिकापर्यंत संविधान पोहोचणे गरजेचे आहे. डॉ. आंबेडकर यांचे आचार, विचार जनमानसात रुजवण्यासाठी संविधान प्रत वितरित करण्याचा कार्यक्रम शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राज्यभर राबवण्यात येणार आहे.
डॉ. आंबेडकर यांनी घटना परिषदेच्या माध्यमातून अथक परिश्रमातून भारतीय राज्यघटना साकारली. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय राज्यघटना देशाला अर्पण करण्यात आली. न्याय्य हक्क, संवैधानिक अधिकार, आणि कर्तव्य याची जाणीव सर्वसामान्य नागरिकांना होण्यासाठी भारताचे संविधान त्यांच्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यामुळे अभ्यासक्रमाच्या माध्यमातून संविधानाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, म्हणून हा विषय सर्व विद्याशाखांत अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button