'धनंजय मुंडेंची प्रकृती चांगली, हृदयविकाराचा धक्का नाही, भोवळ आल्याने रुग्णालयात दाखल'
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती चांगली असून, तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ते उपचार घेत आहेत. सतत प्रवास, दगदग यातून त्यांना भोवळ येऊन शुद्ध हरपली व त्यानंतर तातडीने त्यांना ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला, हे वृत्त चुकीचे आहे, अशी माहती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
डॉक्टरांनी आणखी काही चाचण्या सांगितल्या असून, सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असल्याचेही पवार म्हणाले. आज सकाळी अजित पवार यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेतली, यावेळी त्यांनी मुंडे यांची विचारपूस करत डॉक्टरांकडून माहिती घेतली. डॉक्टरांनी त्यांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला असून, येत्या तीन – चार दिवसांत त्यांना आराम मिळेल, असेही अजित पवार म्हणाले. रुग्णालयाच्या वतीने डॉ. प्रतीत समदानी यांनी अधिक माहिती दिली.
काल धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात जनता दरबारास उपस्थित होते, त्यानंतर ते शरद पवार यांनाही भेटले, या दरम्यान प्रकृती अस्थिर होऊन त्यांना भोवळ आल्याने शुद्ध हरपली होती. त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात आले होते.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही धनंजय मुंडे यांना दूरध्वनीवरून संपर्क करत विचारपूस करून काळजी घेण्याचा सल्ला दिला. खासदार सुप्रिया सुळे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आदींनी त्यांची रुग्णालयात भेट घेऊन चौकशी केली.
माजी मंत्री पंकजा मुंडे यांनीही रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनीही धनंजय मुंडे यांची प्रकृती चांगली असल्याचे सांगितले.
मुंडे हे सोमवारी दिवसभर बीड आणि परभणी जिल्ह्याच्या दौर्यावर होते. मंगळवारी ते मुंबईत होते. सायंकाळी साडे सहा वाजता ते जनता दरबार आटोपून निवासस्थानाकडे निघाले असता त्यांना अचानक छातीत दुखू लागले. त्यानंतर त्यांना तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून, काळजीचे कारण नाही, असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. पुढील काही दिवस त्यांना विश्रांतीसाठी रुग्णालयात रहावे लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
- दोन वर्षांनंतर पुन्हा पंढरीची पायी वारी, आळंदीतून २१ जूनला माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
- कर्नाटक : …तोपर्यंत संतोषच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार नाही ; कुटुंबीयांचा निर्धार
- कोल्हापूर : ही दोस्ती तुटायची नाय; मंत्री मुश्रीफ-पालकमंत्री पाटील यांची गळाभेट
आदरणीय खा. @PawarSpeaks साहेबांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या जनता दरबार उपक्रमांतर्गत आज मुंबई @NCPspeaks कार्यालयात उपस्थित राहून जनता व कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्राप्त निवेदनांवर आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधितांना केल्या आहेत. पुढच्या मंगळवारी भेटूच! pic.twitter.com/aDJ35bLGy2
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 12, 2022