नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर राज्यात राजकीय पतंगबाजी सुरु झाली होती. उभय नेत्यांमध्ये तब्बल २५ मिनिटे पंतप्रधान कार्यालयात ही भेट झाली. या भेटीनंतर शरद पवार यांनी दिल्लीतील निवासस्थानी पत्रकार परिषद घेत भेटीचा तपशील सांगितला.
पीएम मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईचा मुद्दा उपस्थित केल्याचे शरद पवार यांनी सांगितले. ते एका दैनिकाचे संपादक आहेत तसेच राज्यसभेचे सदस्य आहेत अशा परिस्थितीत कोणत्या आधारावर कारवाई करण्यात आली असा मुद्दा पवारांनी मोदींकडे उपस्थित केला. त्यांच्यावर झालेली कारवाई अन्यायकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, दाऊदशी संबंध असल्याचा आरोपावरून अटकेत असलेल्या नवाब मलिक यांच्या कारवाईवरून कोणतीच चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच राज्यात होत असलेल्या ईडी कारवाईवरूनही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी नमूद केले. पवार यांनी महाविकास आघाडी कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा सत्तेत येणार असल्याचा दावा केला.
राज्यात प्रलंबित असलेल्या १२ आमदारांच्या नियुक्तीवरूनही पंतप्रधानांना अवगत केल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. याबाबत पीएम मोदी योग्य तो निर्णय घेतील असे ते म्हणाले. पवारांनी मोदींची भेट घेतल्याने राज्यातील समीकरणांवर भाजप नेत्याकडून आडाखे बांधले जात होते. मात्र, पवारांनी राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार नाही, शिवसेना आणि राष्ट्रवादी भाजपच्या विरोधात असल्याचे सांगितले. दुसऱ्याच्या सांगण्यावरून राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार नाही असे ते म्हणाले.
शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नसल्याचे सांगितले. त्याचबरोबर राज्यात सुरु असलेल्या मंत्रिमंडळ फेरबदल चर्चेला सुद्धा त्यांनी पूर्णविराम दिला. सध्या मंत्रिमंडळात कोणतेही बदल होणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचलं का ?