नवाब मलिक यांना दिलासा नाहीच; न्यायालयीन कोठडीत १८ एप्रिल पर्यंत वाढ | पुढारी

नवाब मलिक यांना दिलासा नाहीच; न्यायालयीन कोठडीत १८ एप्रिल पर्यंत वाढ

मुंबई; पुढारी ऑनलाईन

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत १८ एप्रिल पर्यंत वाढ करण्यात आली आहे. दाऊद इब्राहिम मनी लाँडरिंग प्रकरणी ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. आता PMLA कोर्टाने त्यांच्या कोठडीत आणखी वाढ केली आहे.

दाऊद इब्राहिम मनी लॉड्रिंग प्रकरणी २३ फेब्रुवारी २०२२ रोजी नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात आठ तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर मलिक यांना अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्‍यात आली होती. यानंतरही सत्र न्यायालयाने त्यांच्या न्यायालयाने कोठडीत ४ एप्रिलपर्यंत वाढ केली होती. आता पुन्हा त्यांच्या कोठडीत १८ एप्रिल पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

मलिक यांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई कायद्यानुसारच असल्याचे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने ईडी कारवाई विरोधातील मलिकांची याचिका फेटाळली होती. तसेच अटक बेकायदेशीर असल्याचा नवाब मलिकांचा दावा चुकीचा असल्याचे उच्च न्यायालयाने सांगितले होते.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले नवाब मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मलिकांविरोधात करण्यात आलेल्या कारवाई संबंधी दाखल केलेली याचिका फेटाळली होती. उच्च न्यायालयाच्या याच आदेशाला मलिकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. अटके विरोधात मलिकांकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणीची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. अशात सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button