संजय राऊत यांचे राज ठाकरेंना प्रत्त्युत्तर; आमचं राजकारण नकलांवर चालत नाही | पुढारी

संजय राऊत यांचे राज ठाकरेंना प्रत्त्युत्तर; आमचं राजकारण नकलांवर चालत नाही

मुंबई; पुढारी ऑनलाईन डेस्क : पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १६ व्या वर्धापन दिना निमित्त आयोजित सभेमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खा. संजय राऊत यांच्यवर टिका केली. यास प्रत्त्युत्तर देताना खा. संजय राऊत यांनी आमचे राजकारण नकलांवर उभे नसल्याचा टोला राज ठाकरे यांना लगावला.

पुण्यातील सभेत राजठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या अशी टिका केली होती. त्यास उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, काही लोक आजारी नसताना देखिल सक्रीय नसतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तंदुरुस्त आहेत आणि सक्रीय आहेत. शिवाय ते आजरी असताना सुद्धा सक्रिय होते. महाराष्ट्राला आजारपणाच्या काळात सुद्धा सक्रिय असणारा मुख्यमंत्री मिळाला असल्याचे राऊत म्हणाले.

राज ठाकरे यांच्या टिकेचा समाचार घेताना खा. संजय राऊत म्हणाले, बाळासाहेबांची शिवसेना आहे येथे डुप्लीकेट काही नाही. आमचे राजकारण हे स्वाभिमानावर आणि संघर्षावर उभे आहे. आमचे राजकारण नकलांवर उभे नाही.

पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासभेत मनसेचे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की, “निवडणुका आता दिवाळीनंतरच होणार म्हणजे पावसाळ्यात निवडणुका घेणार आहात का? काय चाललंय राज्यामध्ये हेच कळत नाही. निवडणुका पुढे ढकलण्यासाठीच ओबीसींच राजकारण केलं जातंय. मुख्यमंत्री आजारी असल्याने निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. आता प्रत्येक जण म्हणतो की आम्हाला संपवण्याचा डाव… राजकारणात ते संजय राऊत कसली भाषा वापरताहेत. कसेही बरळताहेत”, असे बोलत राज ठाकरे यांनी शिवसेना नेता संजय राऊत यांची नक्कल करत थेट टीका केली होती.

राज ठाकरे या सभेत पुढे म्हणाले, “युक्रेन आणि रशियाच्या युद्धावर बोलण्यापेक्षा तुमच्या घरातलं बघा. आजही आत्महत्या होत आहेत. महिला आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न कोण सोडवणार ? लोकं आपले प्रश्न घेऊन जे आमच्याकडे येतात ना… हीच आपली १६ वर्षांची कमाई आहे. महाराष्ट्र सैनिक कोरोनाची कसलीच भिती न बाळगता लोकांपर्यंत पोहोचला. लोकं त्यांच्याकडे विश्वासाने येत होते. तुमच्यातील जी महाराष्ट्रासाठी काही करायची आग आहे ना… ती विझू देऊ नका. शिवजयंती हा माझ्या राजाचा सण आहे. शिवजयंती तिथीनुसारच साजरी व्हायला हवी. शिवरायांमुळे आपली खरी ओळख आहे. शिवरायांच्या भूमीत आम्ही राहतो, त्यामुळे २१ मार्चला शिवजयंती साजरी करा”, असं आवाहनदेखील राज ठाकरे यांनी आपल्या मनसैनिकांना केली.

Back to top button