मुबंई, पुढारी ऑनलाईन: राज्यातील झालेल्या जोरदार पावसामुळे पूरग्रस्त निराधार कुटुंबांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात येणार आहे. या पूरग्रस्त कुटुंबाना राज्य सरकार १० किलो गहू, तांदूळ, ५ लिटर रॉकेल मोफत देणार आहे.
अधिक वाचा:
गेल्या २ दिवसांपासून कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे.
अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून अनेक ठिकाणी पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पूरग्रस्त नागरिकांसाठी ही घोषणा केली आहे.
पूरग्रस्त भागांतील नागरिकांना मोफत धान्य आणि शिवभोजन थाळीचं वितरण करण्यात येणार असल्याची घोषणा अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.
अधिक वाचा
याबाबत माहिती देताना अन्नधान्य पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेमध्ये याची माहिती दिली आहे. 'पावसामुळे आणि पुरामुळे लोकांची घरंदारं गेली.
घरातले सामान वाहून गेले. अनेक लोकांना मदतीची आवश्यकता आहे.
त्यामुळे दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी जे क्षेत्र पाण्यात बुडाले असेल, घरे वाहून गेली असतील किंवा नुकसान झाले असेल.
अशा निराधार कुटुंबांना राज्य सरकारकडून प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू, १० किलो तांदूळ, ५ लिटर रॉकेल मोफत देण्यात येणार आहे.
यासंदर्भातला शासकीय आदेश मार्च २०१९ला काढण्यात आला आहे. त्यात थोडा बदल करून ज्यांना गहू नको असेल, त्यांना तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोकणात प्रामुख्याने भाताचा समावेश जेवणात असतो. त्यामुळे तांदूळ देखील पुरवले जातील.
यासोबतच तिथे उपलब्ध असलेली किंवा लोकांच्या आहारात असलेली ५ किलो डाळ देखील पुरवण्याचा निर्णय झाला आहे.'
शिवभोजन थाळीबाबत बोलताना ते म्हणाले, 'संबंधित जिल्ह्यातील स्थानिक प्रशासन किंवा जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून या अन्नधान्य आणि शिवभोजन थाळीचे वाटप केले जाणार आहे.
त्याशिवाय, अशा ठिकाणी शिवभोजन थाळीचं देखील रोजच्या मर्यादेपेक्षा दुप्पट संख्येने वाटप करावं असे निर्देश दिले आहेत.'
हेही वाचलेत का:
पहा व्हिडिओ: शहराला महापुराचा विळखा