उमरगा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील मुळज शिवारातील एका विहिरीत इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि. १६) संध्याकाळी घडली. याबाबतची प्राथमिक माहिती अशी की, मुळज येथील रहिवाशी असलेला चैतन्य अंबादास पांचाळ (वय १५) हा उमरगा येथील महात्मा बसवेश्वर विद्यालयात नववीच्या वर्गात शिकतो. बुधवारी नववीचा मराठी विषयाचा पहिला पेपर सोडवून तो दुपारी वडिलांच्या मुळज शिवारातील शेतात गेला.
चैतन्यला पोहता येत असल्याने विहिरीत पोहण्यासाठी गेला. दुसऱ्या वेळा त्याने विहिरीत उडी मारली त्यावेळी तो लवकर बाहेर आला नाही. ही बाब शेतात असलेल्या आजोबाच्या लक्षात आली. या घटनेची माहिती मिळताच सांयकाळी पोलिस हवालदार दिंगबर सुर्यवंशी व अन्य कर्मचारी घटनास्थळी पोहचले. गाळात अडकलेल्या चैतन्यचे प्रेत बाहेर काढण्यासाठी विहिरीत जास्त पाणी असल्याने ग्रामस्थांनी वीजपंपाच्या सहाय्याने पाणी काढण्याचे काम सुरू केले होते.