

नायगाव : मांजरम गावातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाढलेली वाहतूक, चौरस्ता तसेच शाळकरी विद्यार्थी, नागरिक व प्रवाशांची वर्दळ लक्षात घेता अपघात टाळण्यासाठी गतिरोधक, झेब्रा क्रॉसिंगच्या पांढऱ्या पट्ट्या आणि दिशादर्शक फलक तातडीने बसवावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भास्कर दिगंबरराव पाटील गायकवाड यांनी केली आहे.
या मागणीसंदर्भात गायकवाड यांनी गुरुवारी (दि. २०) नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील आवक-जावक विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), नांदेड येथे सविस्तर निवेदन सादर केले. मांजरम गावातील मुख्य रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असून, गावाजवळ चढ-उतार, चौरस्ता आणि बसस्टॉप परिसरात नागरिकांची मोठी ये-जा असते. त्यामुळे या मार्गावर वाहनांचा वेग नियंत्रणात ठेवणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सध्या काही ठिकाणी गतिरोधक असले तरी ते रात्रीच्या वेळी वाहनचालकांना स्पष्टपणे दिसत नाहीत. तसेच गतिरोधकांवर पांढऱ्या झेब्रा पट्ट्या, रिफ्लेक्टर तसेच योग्य सूचना फलक नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, पादचारी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
मांजरम गावातील धोकादायक ठिकाणांची तातडीने पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी मानक पद्धतीचे गतिरोधक बसवावेत, विद्यमान गतिरोधकांवर पांढऱ्या झेब्रा पट्ट्या माराव्यात, गतिरोधकाच्या दोन्ही बाजूंना रिफ्लेक्टर/कॅट्स आय बसवावेत, तसेच वाहनचालकांना पूर्वसूचना मिळण्यासाठी ‘गतिरोधक पुढे आहे’ असे स्पष्ट दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच मांजरम बसस्टॉप व चौरस्ता परिसरात रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने विशेष उपाययोजना करून पादचारी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
“अपघात होण्याची वाट न पाहता, अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात,” अशी आग्रही भूमिका भास्कर पाटील गायकवाड यांनी निवेदनातून मांडली आहे. संबंधित विभागाने या मागणीची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा मांजरम परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.