

नायगाव : शहरातील प्रसिद्ध चिद्रावार यांच्या तिन्ही कापड दुकानांवर जी एस टी विभागाने एकाच वेळी धाड टाकली असून संपूर्ण व्यवहाराची कसून चौकशी करण्यात येत आहे. आयकर विभागाने केलेल्या कारवाईमुळे शहरातील व्यापारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान अंदाजे ४० अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक या कारवाईत सहभागी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नायगाव येथे १७ ऑगस्ट रोजी जी एस टी विभागाच्या पथकाकडून तीनही दुकानांमधील खरेदी - विक्रीचे व्यवहार, खरेदी व विक्री किमतींमधील तफावत आणि व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांची कसून तपासणी सुरू आहे. दुकानातील उपलब्ध मालाची खरेदी पक्क्या बिलावर झाली आहे की कच्च्या बिलावर, यासह विविध बाबींची पडताळणी केली जात असल्याची माहिती आहे.
एकाच वेळी तीनही शाखांवर कारवाई झाल्याने नायगावच्या व्यापारी क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. या तपासणीमुळे शहरातील इतर व्यावसायिकांमध्येही हालचाली वाढल्या असून, काही व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवल्याचे दिसून येत आहे.
ही कारवाई आणखी किमान तीन दिवस सुरू राहण्याची शक्यता असल्याचे समजते. मात्र, आयकर विभागाच्या तपासणीत नेमके काय आढळून आले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तपासणी करणाऱ्या तपासणी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, “कार्यवाही पूर्ण झाल्याशिवाय याबाबत कोणतीही माहिती देता येणार नाही,” असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या मोठ्या कारवाईतून नेमके काय समोर येणार, कोणते व्यवहार किंवा कागदपत्रे तपासणीच्या केंद्रस्थानी आहेत आणि कारवाईनंतर आयकर विभागाकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे नायगावसह परिसरातील व्यापारी वर्तुळाचे लक्ष लागले आहे.