हिंगोली : पुढारी वृत्तसेवा : सेनगाव ते रिसोड मार्गावर पानकनेरगाव फाट्याजवळ भरधाव कार रस्त्यातील दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघातात ५ जण जखमी झाले. ही घटना रविवारी रात्री घडली. जखमी पैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड येथील ५ जण कारने विदर्भातील रिसोड येथे गेले होते. रविवारी रात्रीच्या सुमारास तेथून काम आटोपून ते परत नांदेडकडे निघाले होते. दरम्यान, त्यांची कार पानकनेरगाव फाट्याजवळ आली असता चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर जाऊन जोराची आदळली. या अपघातात कारमधील कुणाल थोरात, सोमेश्वर नागेश्वर, स्वप्नील चौदंते, अर्जुन विटकरे व अन्य एक जण जखमी झाले.
या अपघाताची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी हिंगोलीतील खासगी रुग्णालयात दाखल केले . जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे.
हेही वाचलंत का ?