

छत्रपती संभाजीनगर : उन्हाच्या कडाक्याने रक्तदान शिबिराचे आयोजन आणि रक्तदान घटल्याने जिल्ह्यात रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे.
घाटीसह शहरातील रक्त-पेढ्यांमध्ये अवघ्या दोन ते तीन दिवस पुरेल ऐवढाच रक्तचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल आणि रक्त मिळवण्यासाठी नातेवाइकांना धावाधाव करावी लागत आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी दात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. यंदाही उन्हामुळे महिन्याभरापासून शहरात रक्तदान शिबीरांचे आयोजन जवळपास नाहीच आहे. याचा परिणाम रक्तपेढ्यांवर दिसून येत असून, घाटीतील शासकीय रक्तपेढीसह इतर खासगी रक्तपेढ्यांवर रक्ताची मोठी टंचाई जाणवत आहे.
घाटीतील शासकीय रक्तपेढीत अवघ्या तीन दिवस पुरेल ऐवढाच रक्तसाठा शिल्लक आहे. इतर खासगी रक्त-पेढ्यांवर हीच परिस्थिती आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी रक्तपिशवी घेण्यासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना रक्तपेढ्यांतर्फे रक्तदान करण्याचे सांगितले जात आहे. पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन केले आहे.
रक्तदानाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी
रक्तदान पूर्णपणे सुरक्षित व वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित प्रक्रिया आहे
निरोगी व्यक्ती प्रत्येक ३ महिन्यांनी रक्तदान करू शकते
रक्तदानामुळे कोणतीही कमजोरी किंवा हानी होत नाही
एका रक्तदानाने ३ रुग्णांचे प्राण वाचू शकतात
घाटीतील विभागीय रक्त केंद्र येथे दात्यांना रक्तदान करता येईल.
तुमचे थोडेसे रक्त, कोणाच्या आयुष्याचा आधार - घाटी रुग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे. अनेक रुग्णांना तातडीने रक्ताची आवश्यकता भासत आहे. अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण, बॅलेसेमिया तसेच गंभीर आजारांच्या रुग्णांना वेळेवर रक्त मिळणे अत्यंत आवश्यक आहे. आपले थोडेसे रक्त-कोणाच्या तरी आयुष्याचा आधार बनू शकते.
डॉ. भारत सोनवणे, विभागप्रमुख, घाटी