

Positive talks between Jarange and the government
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचे गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणात बुधवारी रात्री सरकारचे प्रतिनिधी म्हणून आलेले आ. प्रसाद लाड यांनी शिष्टाई केली. आपल्या मागण्याबाबत शासनाने काढलेल्या तोडग्यावर (मसुदा) जरांगे यांचे समाधान झाले. त्यामुळे त्यांनी आ. लाड यांच्या हस्ते पाणी पिले. मात्र मागण्यावर अंमलबजावणीसाठी सरकारला दोन दिवसांचा अल्टीमेटम देत त्यांनी तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचे जाहीर केले.
बुधवारी रात्री आ. लाड अंतरवालीत दाखल झाले. यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत सरकारकडून करण्यात होत असलेल्या कार्यवाहींचा मसुदा जरांगे यांच्यासमोर सादर केला. ५८ लाख कुणबी नोंदींचा त्यात उल्लेख करण्यात आला आहे. या नोंदी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीवर लावल्या जातील, असे लाड यांनी सांगितले. मराठा समाजातील अर्जदारांनी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत. ज्यांची नोंद उपलब्ध होईल, त्यांना प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही केली जाईल. या प्रक्रियेचे मॉनिटरिंग आपण स्वतः करणार असल्याचेही लाड यांनी स्पष्ट केले. मराठवाड्यात जात पडताळणी प्रमाणपत्राची प्रक्रिया गुरुवारी दुपारपर्यंत सुरू करण्याबाबत कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
हैदराबाद गॅझेटचा विषय न्यायप्रविष्ट असून, ९० दिवसात निकाल आल्यानंतर सातारा, कोल्हापूराबाबत निर्णय घेतला जाईल, असे लाड म्हणाले. त्यावर सातारा, कोल्हापूर गॅझेटचा जीआर काढावा, त्याची अंमलबजावणी तीन महिन्यानंर करावी, अशी मागणी जरांगे यांनी केली. मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी २० टक्के गुन्हे मागे घेण्यात आल्या असल्याचेही लाड यांनी सांगितले.
मराठा-कुणबी कक्षासाठी मंत्रालयात 1,250 चौरस फुटांचे कार्यालय उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच ओबीसींना मिळणाऱ्या सवलती मराठा समाजालाही देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सारथी संस्थेला 49 कोटी रुपये वर्ग करण्याचा शासन निर्णय बुधवारी काढण्यात आला असून या संस्थेला निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे लाड यांनी सांगितले. यासह सर्व १५ मागण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगत लाड यांनी जरांगे यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. त्यावर जरांगे यांनी 'दोन दिवसात आपल्या मागण्यांची अंमलबजावणी करा व शासन आदेश काढा, तोपर्यंत मी पाणी पितो पण उपोषण सोडणार नाहीं' असे सांगत उपोषण सोडण्यात नकार दिला.
विखे खरे बोलत नाहीत : जरांगे
प्रसाद लाड हे समाजासाठी चांगले काम करीत असल्याची प्रशंसा करतानाच, जरांगे यांनी विखे- पाटील यांच्यावर टीका केली. विखे-पाटील कधीच खरे बोलत नाहीत, ते काही तरी शाळा करत आहेत आणि शिंदे-फडणवीस यांच्यात मांडण लावत आहेत. आमचे त्यांच्याशी वैयक्तिक शत्रुत्व नाही; पण ते नेहमी खोटे बोलतात, असा आरोप त्यांनी केला. या चर्चेनंतर लाड यांनी मनोज जरांगे यांना पाणी पिण्याची विनंती केली. तेव्हा जरांगे यांनी पाणी पितो, सलाईन लावतो, असे सांगितले. दोन दिवस सलाईन लावणार आणि पाणी पिणार; पण उपोषण सोडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारचे शिष्टमंडळ दोन दिवसांपासून संभाजीनगरात
मनोज जरांगे यांच्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत व आ. प्रसाद लाड हे मंगळवारपासून संभाजीनगरात तळ ठोकून आहे. जरांगे यांच्या मागण्यांवर सरकार सहमत-
आमचे पूर्ण प्रयत्न : विखे
मराठा उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील म्हणाले की, ज्या मागण्या जरांगे यांनी मांडल्या. त्यानुसार मंगळवारी १५ मसुद्यांवर मसुदा तयार केला. न्या. शिंदे समितीने मराठा समाजाच्या ५८ लाख कुणबी नोंदी असल्याचे सांगितले होते. त्यानुसार शासनाकडून कार्यवाही सुरू आहे. न्या. शिदे समितीच्या स्थापनेनंतर ३.५० लाख प्रमाणपत्रे दिली आहेत. त्यासोबतच हैदराबाद गॅझेटनुसारही कार्यवाही सुरू असून सुमारे प्राप्त ३५०० अर्जापैकी ३३०० अर्ज निकाली काढत प्रमाणपत्रे वितरितही केले असल्याचे त्यांनी सांगितले. सातारा गॅझेटबाबत अॅडव्होकेट जनरलकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. हैदराबाद गॅझेटबाबत न्यायालयात याचिका दाखल असल्याने सातारा, पुणे, औंध गॅझेटवर आताच प्रक्रिया करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे एकाचा दुसऱ्यावर परिणाम होईल, अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली-