

छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजनेत घाईघाईने नळजोडण्या देण्याऐवजी महापालिकेकडून अंतर्गत जलवाहिनीची हायड्रोलिक चाचणी पूर्ण करण्यावर भर दिला असून शहरात १,२०० किमी पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यापैकी १,००० किमी पाइपलाइनची चाचणी बाकी असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून जलवाहिनी सुरक्षित असल्याचा अंतिम अहवाल मिळाल्यानंतरच नागरिकांना नवीन नळजोडण्या दिल्या जाणार असल्याची माहिती शुक्रवारी (दि.३१) मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहरात नवीन योजनेद्वारे पाणी देण्यासाठी अंतर्गत डीआय जलवाहिनीची हायड्रोलिक चाचणी केली जाणार आहे. त्यानंतरच नळ कनेक्शन देण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून पाइपलाइननिहाय नियोजन मागविण्यात आले आहे. तसेच पहिल्या टप्प्यात २०० एमएलडी पाणी उचलण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या नव्या योजनेतून १०० एमएलडी, तर जुन्या योजनेतून ११० एमएलडी असे एकूण २१० एमएलडी पाणी शहराला मिळत आहे.
यापैकी १० ते १५ एमएलडी पाणी जलवाहिन्यांची स्वच्छता आणि हायड्रोलिक चाचणीसाठी वापरले जात आहे. तर १५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून हरसिद्धीमाता आणि टीव्ही सेंटर-३ जलकुंभांमध्ये पाणी सोडण्यात आले असून सिडको एन-७ येथील दोन्ही जलकुंभही भरले आहेत. जलकुंभभरल्यानंतर अंतर्गत डीआय पाइपलाइनची हायड्रोलिक चाचणी सुरू झाली आहे.
याचवेळी २००० मिमी आणि ११०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांची स्वच्छता व तांत्रिक तपासणीही सुरू आहे. तर मिसारवाडी परिसरात अंतर्गत पाइपलाइनची हायड्रोलिक चाचणी सुरू असून, ज्या ठिकाणी गळती अथवा तांत्रिक त्रुटी आढळत आहेत, त्या तातडीने दुरुस्त केल्या जात आहेत. त्यामुळे संपूर्ण चाचणी पूर्ण झाल्यानंतरच त्या भागातील नागरिकांना नवीन नळजोडण्या दिल्या जाणार आहेत.
तसेच चाचणी समाधानकारक झाल्यावरच जोडण्याअंतर्गत जलवाहिनीची हायड्रोलिक चाचणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून केली जात आहे. चाचणी यशस्वी ठरल्यानंतरच प्राधिकरणाकडून ग्रीन सिग्नल दिला जाईल. त्यानंतरच नवीन नळजोडण्यांची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे आयुक्त अमोल येडगे यांनी स्पष्ट केले.
१ हजार किमी पाइपलाइनची चाचणी अद्याप बाकी
शहरात सुमारे १,९०० किमी अंतर्गत जलवाहिनीचे नियोजन असून १,२०० किमी पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, केवळ २०० किमी जलवाहिनीची हायड्रोलिक चाचणी पूर्ण झाली असून अजून सुमारे १,००० किमी पाइपलाइनची चाचणी बाकी आहे. दररोज केवळ १०० ते १५० मीटर पाइपलाइनचीच चाचणी होत असल्याने नळजोडण्यांच्या प्रक्रियेला विलंब होत आहे. हा वेग वाढविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सदस्य सचिव आणि विभागीय आयुक्तांच्या समितीची बैठक लवकरच होणार आहे.
७०० किमी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी वाढीव निधीची गरज
जलवाहिनी टाकण्यासाठी शहरातील सुमारे ७०० किमी रस्त्यांचे खोदकाम होणार आहे. त्यानंतर रस्ते पूर्ववत करण्यासाठी महापालिकेला अतिरिक्त निधीची आवश्यकता भासणार आहे. हा निधी राज्य शासन किंवा जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आयुक्त अमोल येडगे यांनी दिली.
एसआयआरनंतर नळजोडण्यांना गती
एसआयआरचे काम अंतिम टप्प्यात असून ८ ऑगस्टपर्यंत ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे कर वसुलीचे कर्मचारीही सध्या या कामात गुंतले आहेत. एसआयआर पूर्ण झाल्यानंतर नवीन नळजोडण्या आणि मालमत्ता कर आकारणीच्या कामाला गती दिली जाणार असल्याचे आयुक्त येडगे यांनी स्पष्ट केले.