

छत्रपती संभाजीनगर : गुरुवारी (दि. ३०) रात्री झालेल्या मुसळधार पावसांमुळे ग्रामीण भागांत धावणाऱ्या सुमारे एसटीच्या सुमारे २५ बसफेऱ्या रद्द करण्याची वेळ आली आहे. पावसांमुळे अनेक नागरिकांनी विविध ठिकाणी प्रवास करण्याचा बेत रद्द केल्याने एसटीच्या प्रवासी संख्येवर मोठा परिणाम झाला आहे. प्रवासी संख्या घटल्याने दररोज सुमारे अडीच ते तीन लाखांचा फटका बसत असल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रमोद नेहूल यांनी दिली.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. गुरुवारी जिल्ह्यातील काही तालुक्यांत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सिल्लोड, सोयगाव व कन्नड तालुक्यांतील काही भागांत रस्त्यावर तसेच पुलांवरून पाणी वाहत असल्याने शुक्रवारी (दि.३१) सकाळपासूनच त्या भागांतील बसच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत.
पावसांमुळे विविध तालुक्यांतील सुमारे २५ मार्गावरील बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. रात्रीतून पाण्याची पातळी कमी झाली तर शनिवारी (दि. १) त्या मार्गावर पूर्ववत बससेवा सुरू करता येणार आहेत. पाणी पातळी धोकादायक असेल तर बसफेऱ्या शनिवारीही रद्द करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पावसाचा प्रवासी संख्येवर परिणाम
सलग दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने अनेक प्रवाशांनी बाहेगावी जाण्याचा बेत पुढे ढकलला आहे. त्यामुळे विविध मार्गावरील प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. ग्रामीण भागांत धावणाऱ्या बसेसना होणारी गर्दी ओसरली आहे. तर पुणे, मुंबई, नागपूर या मार्गावरील प्रवासी संख्याही घटल्याने याचा परिणाम उत्पन्नांवर झाला आहे. दररोज सुमारे अडीच ते तीन लाखांचा फटका एसटीला बसत आहे. पाऊस ओसरल्यानंतर प्रवासी संख्या वाढण्याची शक्यता असल्याचीही माहिती नेहुल यांनी दिली.