

Mahavitaran's two-pronged policy, All India Renewable Energy Association protest
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा सौर संचाद्वारे जादा वीजनिर्मिती झाली तर ग्राहकांना प्रतियुनिट ६० रुपये दंड आकारला जात आहे. त्यामुळे सौरऊर्जा प्रकल्प बसवणारे ग्राहक, विक्रेते आणि उद्योजकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
या धोरणाचा निषेध नोंदवण्यासाठी गुरुवारी (दि.५) ऑल इंडिया रिन्यूएबल एनर्जी असोसिएशनच्या नेतृत्वात क्रांती चौक ते महावितरणच्या मिलकॉर्नर कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला.
केंद्र सरकारच्या पीएम सूर्यघर योजनेद्वारे नागरिकांना सौरऊर्जा वापरण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. या योजनेसाठी सरकारकडून अनुदानही दिले जाते. मात्र महावितरणने मागील एक वर्षाच्या सरासरी वीज वापरावर आधारित मर्यादित क्षमतेच्याच सौर यंत्रणेला परवानगी देण्याचा नियम लागू केला.
त्यामुळे अनेक ग्राहकांना अपेक्षित क्षमतेचे सौर प्रकल्प बसवता येत नसल्याची तक्रार आहे. ऑल इंडिया रिन्यूएबल एनर्जी असोसिएशनच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला. मोर्चेकऱ्यांनी घो-षणाबाजी करत महावितरणने लादलेले नियम तात्काळ मागे घेण्याची मागणी केली. यानंतर संघटनेचे विभागीय संचालक मयूर भांगडिया, जिल्हाध्यक्ष गोविंद पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालकाची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.
मोर्चात शकील शेख, मंदार देशपांडे, चंदन लवाडे, प्रीतम गुगले, अजित देसाई यांच्यासह सौर ऊर्जा क्षेत्रातील उद्योजक, तंत्रज्ञ, ग्राहक आणि पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मागणीची पूर्तता झाली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.