

It took two years to remove the encroachment despite informing the authorities
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
शहानुरवाडीतील आपनानगर येथील हिमांशू प्राईडमध्ये एकाने टेरेस फ्लॅटच्या टेरेसवरच अनधिकृत बांधकाम सुरू केले. त्याबाबत खालच्या माळ्यावरील फ्लॅटधारक महिलेने महापालिकेकडे तक्रार केली. परंतु त्याकडे प्रशासनाने सपशेल दुर्लक्ष केले.
अखेर महिलेने माहितीच्या अधिकाराचा आधार घेत संपूर्ण अपार्टमेंटचीच कुंडली काढण्याचा प्रयत्न केला अन् त्यानंतर लगेचच महापालिकेच्या पथकाने पाडापाडीची कारवाई केली. अतिक्रमणाची माहिती देऊनही जर एका महिलेला सलग दोन वर्षे पाठपुरावा करावा लागत असेल तर अतिक्रमण हटाव अन् नगररचना विभाग आहेत तरी कशासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे.
दुध डेअरी चौक ते शहानुरवाडी या रस्त्यावरील आपनानगर भागात नेहा कन्स्ट्रक्शनच्या वतीने काही वर्षांपूर्वी हिमांशू प्राईड नावाचे अपार्टमेंट बांधण्यात आले आहे. यात सुमारे १४ फ्लॅटधारक राहतात. त्यात फ्लॅटनंबर १४ हे रमेश वाईकर आणि तृप्ती वाईकर यांच्या मालकीचे असून, त्यांचे टेरेस अॅटॅज फ्लॅट आहे. त्यांनी दोन वर्षांपूर्वी महापालिकेकडून रीतसर परवानगी न घेताच फ्लॅटच्या मूळ आराखड्यात बदल करून अतिरिक्त बांधकाम करून एक रूम तयार करण्यास सुरुवात केली.
हे अनधिकृत बांधकाम करताना जी तोडफोड आणि बांधकाम करण्यात आले. त्यामुळे अपार्टमेंटमधील इतर मालमत्ताधारकांच्या फ्लॅटच्या स्लॅबला आणि भिंतींना तडे पडण्यास सुरुवात झाली. प्रत्येकानेच सोयायटीच्या ग्रुपवर माहिती टाकून बांधकामाला विरोध केला. त्यावरही बांधकाम थांबत नसल्याने सर्वाधिक क्षती पोहोचलेल्या फ्लॅटधारक नयन पाटील यांनी महापालिकेच्या झोन कार्यालयाला अगोदर अतिक्रमणाबाबात तक्रार केली.
त्यावरही काहीच होत नसल्याने महापालिकेतील अतिक्रमण हटाव पथकाला माहिती दिली, परंतु त्यानंतरही काहीच कारवाई न झाल्याने अखेर संतापलेल्या पाटील यांनी अपार्टमेंटची कुंडलीच काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मनपा नगररचना विभागाला माहितीच्या अधिकारात अपार्टमेंटच्या बांधकामासह मूळ नकाशा आणि बांधकाम क्षेत्राची माहिती मागितली.
परंतु ही माहिती देण्यास नगररचना विभागाने तब्बल दोन वर्षे लावली. नगररचना विभागातील एका उपअभियंत्यांनी महिलेला दररोज खेट्या मारावयास लावल्या. अखेर महापालिका निवडणुकीनंतर नगरसेवक धारेवर धरतील, अशी भीती वाटल्यानंतर लगेच कारवाईच्या दिशेने सुरुवात झाली अन् मागील १५ दिवसांपूर्वीच या अनधिकृत बांधकामावर महापालिकेने हतोडा चालविला.
पूर्ण पाडापाडीकडे दुर्लक्षच महापालिकेच्या अतिक्रमण
हटाव विभागाने हे अनधिकृत बांधकाम पाडले, परंतु ही कारवाई अतिशय थातूरमातूर पद्धतीनेच केली. त्यामुळे अर्धवट बांधकामाला शेड लावून पुन्हा बांधकामाची तयारी सुरू केल्याची तक्रार नयन पाटील यांनी केली आहे.