कोरोना : कोरोनाच्या नव्या नियमांमुळे वधू-वर मंडळी पेचात | पुढारी

कोरोना : कोरोनाच्या नव्या नियमांमुळे वधू-वर मंडळी पेचात

गेवराई ; पुढारी वृत्तसेवा

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असताना अनेकांचे विवाह सोहळे जुळले, मात्र आता पुन्हा राज्‍य शासनाने कोरोनाचे नवे निर्बंध घातल्‍याने अनेकांची अडचण झाली आहे. विवाह कसे उरकायचे, असा प्रश्न पालकांना पडला आहे.

कोरोना रूग्‍णांचे प्रमाण कमी झाल्यानंतर नागरिकांनी लग्न उत्सवाचा धूमधडका सुरू केला होता. कोरोना आता पुन्हा मोठ्याप्रमाणात येणार नाही. अशी आस ठेवून लोकांनी लग्नाच्या तयारीला जोरदार सुरुवात केली होती. काहीचे लग्न सोहळे देखील थाटामाटात पार पडले. परंतु आता मात्र पुन्हा एकदा कोरोनाने आपले डोके वर काढल्याने आणि लागलेल्या नव्या निर्बंधांमुळे लग्न कार्यात अडचण निर्माण झाली आहे.

लग्नकार्य थाटामाटात करणे जनू पंरपराच झाली आहे. त्यामुळेच आपला हा विवाह सोहळा धुमधडाक्‍यात व्हावा या उद्देशाने वधू वर या दोन्ही पक्षांकडून लाखो रूपायांचे खर्चाचे नियोजन केले जाते. याचे बोलके चित्र नेहमीच आपल्याला दिसत असते. त्यात डीजे, मंगल कार्यालय तर लग्नाला येणाऱ्या जेवणाचा खर्चसुध्दा करण्यात येत असल्याचे दिसून येते. मात्र आता पुन्हा कोरोना डोके वर काढतो आहे. यामुळे लग्नसोहळ्यांवर विरजण पडत आहे. लग्न जुळलेल्या नातेवाईकांना लग्नाचे निमंत्रण दिले. लग्न पत्रिका पोहच झाल्या आहेत. लग्न जवळ आले परंतु करोना निर्बंध लागल्याने आता त्यांची पंचाईत झाली आहे.

कोणाला बोलवायचं आणि कोणाला सोडायचे, हा तिढा सुटता सुटेना असा झाला आहे. शासनाने लग्नकार्य जागेच्या क्षमतेत 50 टक्के तर हॉलमध्ये 25% नागरिकांच्या उपस्थितीत पार पाडणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे लग्नास नातेवाईक अधिक आल्यावर आपल्यावर करोना नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात येईल आणि दंड, गुन्हा नोंदवला जाईल या भीतीनं अनेकांनी लग्नकार्य पुढे ढकल्यणास सुरुवात केली आहे.

तब्बल दोन वर्षांनंतर काही महिन्यांकरता सण, समारंभ, कार्यक्रम करण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे पुन्हा सुगीचे दिवस येतील अशी आशा कॅटरर्स व इतर व्यावसायिकांना होती, मात्र परत कोरोना व त्यासोबत निर्बंध निर्माण झाल्याने अनेक कार्यक्रमांच्या रूपरेषेत बदल झाला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा लग्न सोहळ्यात संबंधित व्यावसाय डबघाईस आल्याचे चित्र दिसून येत आहे.

माझ्या मुलीचे लग्न यंदा थाटामाटात करायचे होते. परंतु आता निर्बंध आल्यामुळे 50% उपस्थितीत लग्न संभारभ पार पाडणार आहोत. नातेवाईकांना आता येऊ नका म्हणून फोन करणे सुरू आहे.

वधू पिता

विवाह सोहोळ्या निमित्त आमचा कॅटरर्सचा व्यवसाय छान चालत होता. आता निर्बंध आल्यामुळे पुन्हा एकदा आमचा व्यवसाय ठप्प होणार आहे.

सतू महाराज वैष्णव
कॅटरर्स मालक

Back to top button