Manoj Jarange Patil : ओबीसीतून आरक्षण दिले तरच उपोषण थांबविणार : मनोज जरांगे-पाटील
वडीगोद्री ः पुढारी वृत्तसेवा : सगेसोयरे कायद्याची सरकारने अधिवेशनात चर्चा करावी. वेगळ्या आरक्षणाची चर्चा करू नये. ओबीसीतून आरक्षण दिले तरच उपोषण मागे घेऊ. 15 तारखेच्या अधिवेशनात सरकारने सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी केली नाही आणि हैदराबाद गॅझेट स्वीकारले नाही तर महाराष्ट्रात काय होते हे त्यांना कळेल, असा इशारा मनोज जरांगे ( Manoj Jarange Patil ) यांनी राज्य सरकारला दिला. ते उपोषणाच्या तिसर्या दिवशी पत्रकारांशी बोलत होते.
संबंधित बातम्या
- Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांची अवस्था पाहून महिलांना अश्रू अनावर; पाणी पिण्याची विनंती
- Manoj Jarange Patil …तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही : मनोज जरांगे-पाटील
- Manoj Jarange Patil : मनोज जरांगे उपोषणावर ठाम; आरोग्य तपासणीस दिला नकार
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे. गुलाल उधळला आहे. सर्व मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्या. कुणबी आरक्षणावर आक्षेप घेणार्या हजार-बाराशे लोकांसाठी सरकारने वेगळा कायदा करावा, असे ते म्हणाले. 14 तारखेच्या महाराष्ट्र बंदबद्दल मला माहिती नाही. तो समाजाचा निर्णय असेल तर समाजापेक्षा कुणीही मोठा नाही. आंदोलन शांततेत करावे, असे आवाहन त्यांनी केले. ( Manoj Jarange Patil )
दरम्यान, उपोषणादरम्यान जरांगे पाणी आणि औषधोपचार घेत नसल्याने त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यांनी वैद्यकीय तपासणीलाही नकार दिला आहे. जरांगे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या बीड जिल्ह्यातील मूळ गाव असलेल्या मातोरी गावातील महिला आल्या होत्या. जरांगे यांची खालावलेली तब्येत पाहून या महिलांना अश्रू अनावर झाले. या महिलांनी त्यांना पाणी पिण्याची विनंती केली. मात्र महिलांच्या सततच्या विनंतीमुळे संतापलेल्या जरांगेंनी पाणी घेतले नाहीच; पण महिलांना व्यासपीठाजवळ का येऊ दिले, असा जाब विचारला. तसेच उपोषणस्थळी सारथीचे विद्यार्थी उपोषणाला बसल्याबद्दल त्यांनी नापसंती दर्शविली.