![Manoj Jarange Patil : मनोज जरांगे उपोषणावर ठाम; आरोग्य तपासणीस दिला नकार](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F02%2FUntitled-design-2024-02-10T165235.899.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
वडीगोद्री, शहागड; पुढारी वृत्तसेवा: मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी आज पासून (दि.१०) पुन्हा आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. दरम्यान, त्यांनी आरोग्य तपासणी करण्यास स्पष्टपणे नकार दिल्याने वैद्यकीय पथक विना तपासणी माघारी परतले. Manoj Jarange Patil
सध्या उन्हाचा कडका चांगलाच वाढला असून अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत मनोज जरांगे यांनी अन्न, पाणी, औषधी न घेता आमरण उपोषणाला सुरुवात केल्याने त्यांच्या शरीरावर बाहेरील वातावरणाचा परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांचे पथक त्यांची तपासणी करण्यासाठी आले होते. पण जरांगे यांनी तपासणीला स्पष्ट नकार दिला आहे. Manoj Jarange Patil
राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत मराठा समाजाला फसवत आहे का ? अशी संशयाची भूमिका निर्माण झाल्याने जरांगे- पाटील यांनी अंतरवली सराटी येथे आजपासून (दि.१०) पुन्हा उपोषण अस्त्र बाहेर काढले आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते पुढे म्हणाले की, तत्काळ राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावून अधिसूचना काढावी, अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करावे, मराठा समाजावर आंदोलनामध्ये दाखल झालेले गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, कुणबी दाखले तत्काळ वाटप करून सर्व ग्रामपंचायतीवर चावडी वाचन सह यादी लावण्यात यावी , ज्या कुणबी नोंदी आढळून आले आहेत. त्यांना सगेसोयरे ही संज्ञा लावण्यात यावी, मराठा तरुणांना प्रमाणपत्राचे वाटप व्हावे, अशा मागण्या त्यांनी यावेळी केल्या.
यावेळी राज्यभरातून आलेल्या मराठा समन्वयकांनी विविध विषयांवर आपापली मते जरांगे यांना सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज उपस्थित होता. वडीगोद्रीसह अंतरवाली, शहागड येथे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. जागोजागी पॉईंट लावून पोलीस अधिकारी कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत.
हेही वाचा