छत्रपती संभाजीनगर : अजिंठा लेण्यांचा शोध जगविख्यात प्रतिभावंत कलावंत चित्रकार मेजर रॉबर्ट गिल यांनी लावला. या परिसरात असताना रॉबर्ट यांचे प्रेम त्यांना मदत करणारी आदिवासी तरुणी पारु हिच्याशी जुळले. या दोघांची अनोखी प्रेम कहाणी ना. धों. महानोर यांनी उजेडात आणली. लेण्याजवळ असणारे पारुच्या स्मारकाचे जतन व्हावे म्हणून महानोरांनी पुढाकार घेतला. तसेच आजिंठा या आपल्या पुस्तकात प्रेम कहाणीविषयी सविस्तर लिहिले. (Namdeo Dhondo Mahanor)
अजिंठा गावात पोलिस ठाण्याच्या बाजूला स्मारक उभारलेले आहे. कोरोना काळात या वास्तुची दुरवस्था झाली. संगमरवरावर असलेल्या अक्षरांची कुणीतरी मोडतोड केली. हा दस्ताऐवज सुरक्षित रहावा म्हणून महानोर प्रयत्नशील होते. फेसबुकमधून त्यांनी या विषयाकडे लक्ष वेधले होते. आपणा सगळ्यांच्या वतीने ओंजळभर फुलं व पणतीची ज्योती तेथे ठेवू. यापेक्षा दुसरं काय? ह्या स्मारकाची मी खूप जपणूक करूनही कोणीतरी या पाच-सहा वर्षात खराब केलं. संगमरवरावर या अक्षरांची मोडतोड केली. एवढा महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तावेज सुद्धा आपले लोक जतन करू शकत नाही याचं खूप दुःख आहे. या स्मारकाची पुन्हा नव्याने दुरुस्ती करून त्याच अक्षरांचा संगमरवर लावू. बाजूला दहा तरी झाडं व त्याचे जतन होईल अस छान करता येईल.
ना. धो. महानोर, रानकवी (दि. २३मे २०२०) सलग तेरा चौदा वर्ष रॉबर्ट या परिसरात वावरत असताना त्यांचे पारूशी प्रेम जुळले. इंग्रजांनी १८४४ साली चित्रकार मेजर रॉबर्ट गिल याची अजिंठ्याच्या प्रतिकृती निर्माण करण्यासाठी नियुक्ती झाली. ते लंडन रॉयल एशियाटिक सोसायटीचे क्वालिफाईड आर्टिस्ट होते. ईस्ट इंडिया कंपनीतील मिलिटरीत मेजर होते. ते अजिंठ्यात आल्यावर लेणापूर येथील पारू त्यांच्या संपर्कात आली. पारूला मराठी आणि बंजारा भाषा अवगत तर रॉबर्ट यांना इंग्रजी. परंतु भाषा आणि जातीचे बंध तुटले. हे प्रेम परिसरातील लोकांना आवडले नाही. २३ मे १८५६ ला पारूचा अकस्मात मृत्यू झाला. तिला लोकांनीच मारून टाकल्याचे म्हटले जाते. रॉबर्ट यांनी पारुच्या स्मृती प्रित्यर्थ स्मारक उभे केले.
ll टू द मेमरी ऑफ माय बिलव्हेड पारो ll हू डाईड २३ मे १८५६ ll असे त्याच्यावर लिहिले आहे. महानोरांनी 1996 ला पाच लाख रुपये खर्च करून स्मारक दुरुस्त केले होते. पण नंतर या स्मारकाची दुरावस्था झाली. एमटीडीसी, ग्रामपंचायतिकडे पाठपुरावा करूनही उपयोग झाला नाही. या प्रेमकथेवर दिर्घकाव्य लिहिणाऱ्या महानोरांच्या मनात चित्रपटाचीही कल्पना होती. त्यासाठी नितीन देसाई आवर्जून आले होते व त्यांनी महानोरांशी चर्चा केली. देसाई यांची एक्झिट झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी महानोरांचे जाणे हा दुर्दैवी योगायोग.
हेही वाचा